मुलगी झाली हो या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते म्हणून किरण माने यांना ओळखले जाते. बिग बॉसच्या चौथ्या पर्वामुळे ते पुन्हा चर्चेत आले. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते म्हणून त्यांना ओळखले जाते. सध्या ते त्यांच्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.

किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी बौद्ध धर्म, इस्लाम आणि वारकरी संप्रदाय यांच्याबद्दल पोस्ट शेअर केली आहे. तसेच त्यांनी या पोस्टबरोबर एक बोलका फोटोही पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : निवेदिता सराफ यांचे वय किती? स्वत:च खुलासा करत म्हणाल्या, “मला लाज…”

किरण माने यांची पोस्ट

“बौद्ध धर्म, इस्लाम आणि वारकरी संप्रदाय यांची ‘भावकी’ एकच हाय, असं म्हन्लं तर लै जनांना चारशे चाळीसचा करंट लागंल… काय-काय जन तर चवताळून उठत्याल… अंगावर धावून येत्याल. कारण गौतम बुद्ध, मोहम्मद पैगंबर, संत नामदेव-तुकाराम यांच्या अनुयायांनी आजकाल एकमेकांत भिंती उभ्या केल्यात. काहीजणांनी तर एकमेकांशी उभा दावा मांडलाय.

…पण या महामानवांचे ‘खरे’ विचार जर विवेकबुद्धीनं तपासले तर हे तिघांचाबी वैचारीक ‘डीएनए’ एकच निघतो ! पैगंबरसाहेबांनी त्याकाळात इस्लामची पुरोहितवादातनं, वर्चस्ववादातनं धर्माची सुटका केली. तेच काम इथं गौतम बुद्धांनी केलं. तेच नंतरच्या काळात वारकरी संप्रदायानं केलं. तिघांचाबी पाया एकाच त्रिसुत्रीवर – स्वातंत्र्य,समता आणि बंधुता !

पैगंबरांनी कर्मकांड नाकारले. इस्लामनुसार ईश्वरासाठी साधी उदबत्तीबी लावायची गरज नाय. तसंच वारकरी संप्रदायानं नामजपाला महत्त्व देत रोजच्या व्यवहारात देव शोधायला सांगीतला… ‘कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी’ ! बुद्धांनी तर कर्मकांड औषधालाबी शिल्लक ठेवलं नाय. पैगंबरांनी एकेश्वरवाद सांगीतला. म्हणाले, ‘ईश्वर एक आहे. त्याच्यापर्यन्त पोहोचण्यासाठी कुठल्याही दलालाची गरज नाही’. जे महात्मा फुलेंनीही सांगीतले, “सर्वसाक्षी जगत्पती… त्याला नकोच मध्यस्थी’… संत तुकोबारायांनी तर आधीच ठणकावलंय, “एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम । आणिकांचे काम नाही आता ।।”

ह्याला म्हन्त्यात वैचारिक भावकी. …आता मी एक जगात भारी उदाहरण देतो. तिघांचंबी मेन टारगेट होतं ते ‘समता’ ! जातींची उतरंड नष्ट करून, हीन समजल्या गेलेल्या समाजाचा उद्धार करणं. याचं या तिघांतलं हे साम्य लैच नादखुळा हाय… गौतम बुद्धांनी सुनित नांवाच्या मैला सफाई करणार्‍या कामगाराला बौद्ध धर्मात सामावुन घेउन थेट ‘उपसंपदा’ दिली. मानाचं स्थान. तसंच, संत नामदेव महाराजांनी शुद्र मानल्या गेलेल्या चोखा महाराला किर्तनाचा मान देऊन संतपदाचा मान दिला. तर पैगंबरांनी गुलाम मानल्या गेलेल्या हजरत बिलालला मशिदीत प्रवेश देऊन जगातली पहिली ‘अज़ान’ द्यायला लावली !

अजून काय पायजे? सगळ्यांनी ‘प्रेम’च शिकवलंय वो… नफ़रतीला थारा नाय. मनात नफ़रत पाळणं हा धर्मद्रोह ! निदा फ़ाज़ली म्हणून गेलाय, “चाहे गीता बांचिये, या पढिये कुरान… ‘मेरा तेरा प्यार’ ही, हर पुस्तक का ग्यान !”, असे किरण माने यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “चाइल्ड अस्थमा, अ‍ॅलर्जीचे अटॅक अन्…”, निवेदिता सराफ यांनी सांगितली मुलाच्या बालपणीची अवस्था; म्हणाल्या “त्याला सोडून…”

दरम्यान, किरण माने यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ते सध्या ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत झळकत आहेत. या मालिकेत त्यांनी सिंधुताईंचे वडील अभिमान साठे यांची भूमिका साकारली असून ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.