मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते किरण माने हे कायमच चर्चेत असतात. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वापासून ते प्रसिद्धीझोतात आले. तल्लख बुद्धीच्या जोरावर किरण मानेंनी टॉप ३ मध्ये स्थान मिळवले. सध्या ते विविध प्रकल्पामध्ये व्यस्त आहेत. नुकतंच किरण मानेंनी अभिनेता अक्षय पेंडसेसाठी एक भावूक पोस्ट लिहिली आहे.

अनेक मालिकांमधून आपला ठसा उमटवणारे हरहुन्नरी अभिनेते आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे २३ डिसेंबर २०१२ साली कार अपघातात निधन झाले. एका चित्रपटाचे शुटींग संपवून मुंबईला जाताना पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे आणि त्यांचा दोन वर्षांचा मुलगा प्रत्युष यांचे निधन झाले. किरण माने यांनी अक्षयसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
आणखी वाचा : इलियाना डिक्रुझ विवाहबद्ध? पतीचे नाव ते लग्नाची तारीख; सर्व माहिती आली समोर

किरण माने यांची पोस्ट

“आमच्या नाटकाचा दर पंधरा दिवसांनी पुण्याला दौरा असायचा… पहाटे-पहाटे माटुंग्याहून बस निघायची. रात्री नीट झोप झालेली नसायची. बसमध्ये बसल्या-बसल्या आम्ही पांघरूण घेऊन गाढ झोपून जायचो. मात्र मेगा हायवे सुरू झाला की अक्ष्या पेंडसे उठून खिडकीतून बाहेर दर्‍या-डोंगर-जंगल बघत बसायचा…कायम. मी त्याला म्हणायचो, “झोप की भावा.” तो म्हणायचा,”मला सकाळ-सकाळी हा भवतालचा सगळा परीसर पहायला खूप आवडतो. खूप फ्रेश होतो मी हे पाहून.” प्रचंड आकर्षण होतं त्याला मेगा हायवेचं !

त्याला माहितही नसेल की नंतर कधीतरी याच हायवेवर….
…’त्या’ भिषण अपघाताला आता बरीच वर्ष झाली. त्यानंतर असंख्यवेळा मी सातारहून मुंबईला गेलो. गाडी उर्से टोलनाक्यावर गेलीय आणि अक्ष्याची आठवण झाली नाही असं एकदाही झालं नाही… तिथे गेल्यावर मी कायम पुटपुटतो, “काय यार अक्ष्या… हे बरोबर नाय झालं. हे वय होतं का भावा असं सोडून जायचं !”

दोन दिवसांपूर्वी मी ‘श्री तशी सौ’ नाटकाची आठवण टाकली आणि कमेन्टमध्ये अनेकांनी अक्षय पेंडसेची आठवण काढली… खूप अस्वस्थ झालो… अक्ष्या कायम म्हणायचा, “किरण, तू जरा जास्तच इमोशनल आहेस. हे ठिक नाही. त्रास तुलाच होतो.” काय करू अक्ष्या, अजूनही मला तो माझा स्वभाव मला बदलता आला नाही. कमेन्टस् वाचल्यानंतर आपल्या मैत्रीचे-सहवासाचे अनेक क्षण आठवत बसलोय. मन उदास झालंय. आठवणींचं मळभ दाटून आलंय. तुला खूप मिस करतोय यार…

…अक्षयची आणि माझी आधी ओळख होती…पण खरी घट्ट मैत्री झाली ती या नाटकाच्या निमित्तानं ! नाटकाचे तुफान प्रयोग व्हायचे. सारखे दौरे.. महाराष्ट्रभरच नाही, तर जगभर. दौर्‍यात आम्ही रुम पार्टनर. मग रात्री उशीरापर्यन्त गप्पा-टप्पा, खवय्येगिरी, भटकंती… एकमेकांची सुखदु:खं शेअर करणं…सगळं आलंच ! दोघेही स्ट्रगलच्या समान टप्प्यावर… पण जेलसी, ईर्षा, स्पर्धा असे प्रकार आम्हा दोघांत कधीच झाले नाहीत…फक्त आणि फक्त धमाल !

स्काॅटलंडला ॲबरडिनच्या नाईट क्लबमध्ये मी गोर्‍या पोरींबरोबर डान्स फ्लोअरवर धुमाकूळ घालत असताना लांबून गालातल्या गालात हसत माझ्याकडे पहात डोळे मिचकावणारा अक्ष्या मी कधीच विसरु शकत नाही…

‘ग्लेनफिडीज’ स्काॅच फॅक्टरीला दिलेली भेट.. डफटाऊन-एडींबरा सगळीकडे फिरताना, बाहेर बर्फ पडायला लागला की अक्ष्या त्याच्या आवडीची हळूवार इंग्लीश गाणी ऐकायचा. एक दिवस वैतागून मी आणि अक्षता बिवलकरने ‘जवा नविन पोपट हा’ , ‘आबा जरा सरकून बसा की नीट’ पासून ‘ढगाला लागली कळ’ अशी लावलेली इरसाल गाणी… त्यावर वैतागलेला अक्ष्या…हे आठवून अजूनही हसू येतं. तो अतिशय शिस्तप्रिय, मी बेशिस्त. तो टापटिपीत रहाणारा, मी धसमुसळा. अति सभ्यपणावरून मी त्याची जाम खेचायचो ! पण तो चिडायचा नाही. एकदम जेंटलमन, कष्टाळू, सुसंस्कृत… टोकाचा मातृभक्त ! आईचा प्रचंड प्रभाव त्याच्यावर. ‘ग्रेट कूक’ !! त्याच्या हातचे खूप पदार्थ आवडीनं खाल्लेत मी.

आम्हा दोघांच्याही मुलांचा जन्म आठदहा दिवसांच्या अंतराने झाला. कायम आमचा एकमेकांना फोन…मी फोन करायचो, ‘अरे आरूष आज स्वत:हून पालथा होऊ लागला.’ तो सांगायचा ‘प्रत्युषही ट्राय करतोय…’ आमच्या लेकरांच्या वाढीचा एकेक दिवस आम्ही एकमेकांशी उत्सूकतेनं शेअर करायचो ! अक्षय तर मुलाची शी-शू धुणे, अंघोळ घालणे आणि मुलाचं लंगोट वगैरे धुवून वाळत घालण्यापर्यन्त सगळं-सगळं हौसेनं करायचा. मला आश्चर्य वाटायचं. मला नाही जमायचं ते….

अक्ष्या गेला… जाताना प्रत्युषलाही बरोबर घेऊन गेला… छे… नाही यार अक्ष्या… डोळे भरून येताहेत… नाही लिहू शकत मी तुझ्यावर…. ही वेळ नव्हती गड्या तुझी जाण्याची अक्ष्या !”, अशी पोस्ट किरण माने यांनी लिहिली आहे.

आणखी वाचा : लग्न न करताच इलियाना डिक्रुझ झाली आई, गोंडस बाळाचा पहिला फोटो आला समोर, नावही आहे खास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अक्षय पेंडसेने प्रायोगिक रंगभूमीवर अनेक नाटकांमध्ये काम केले होते. माझ्या वाटणीचे खरेखुरे, सिगारेट्स ही त्याने प्रायोगिक नाटके केली. तर ‘मिस्टर नामदेव म्हणे’ या व्यवसायिक नाटकातही तो झळकला. त्याबरोबरच मला सासू हवी या मालिकेतही त्याने काम केले. कैरी, कायद्याचे बोला आणि उत्तरायण या चित्रपटातही काम केले. ‘उत्तरायण’ चित्रपटातील त्याची भूमिका विशेष लक्षवेधी ठरली