छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. या मालिकेतून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. त्यातीलच एक कलाकार म्हणजे मिलिंद गवळी. मिलिंद गवळी यांनी या मालिकेमध्ये अनिरुद्ध देशमुख हे पात्र साकारले आहे.
मिलिंद गवळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते निरनिराळे व्हिडीओ व फोटो शेअर करीत चाहत्यांना अपडेट देत असतात. नुकताच मिलिंद गवळी यांनी आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवरचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारेवर शेअर केला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी ही मालिका नेमकी कुठे शूट केली जात आहे याचे लोकेशनही सांगितले आहे.
हेही वाचा-
मिलिंद गवळी यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिलं “मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढे घड्यारं तुला भीती कोणाची परवा बी कुणाची” बरोबर चार वर्षांपूर्वी २०१९ डिसेंबर महिन्यात , आपल्याला आता सिरीयलचं शूटिंग ठाण्यामध्ये करायचा आहे म्हणून आपण एकदा ती शूटिंगची जागा बघायला जाऊ असं मनात ठरवलं , शूटिंग सुरू व्हायच्या आधी सेट बघायला मी आलो, सेटचं काम जोरात चालू होतं, आमचे “आई कुठे काय करते” या मालिकेचे निर्माते राजन शाही यांनी पालेकर यांची जागा शूटिंगसाठी ठरवली. आणि ठाण्यामध्ये ओवळ्या जवळ पानखंडा गावात ही जागा आहे, मी शोधत शोधत तिथे पोहोचलो, कोकणातल्या गावातले जसे रस्ते आहेत तसाच रस्ता या पालेकर बंगल्याकडे जातो , त्यात पानखंड रोड वरून थोडं पुढे गेलं तर एक छान नदी आहे ओढा, झरा आहे, हिरवीगार डोंगर आहे, अगदी गावातलं वातावरण आहे, गजबजलेल्या ठाण्या शहरातील , रहदारीच्या घोडबंदर रोड ला लागून, इतकी सुंदर निसर्गरम्य जागा असेल असं कोणालाही वाटणारच नाही.”
पुढे त्यांनी लिहिलं “मग सिरीयल साठी या जागेचं या बंगल्याचं नाव ठेवलं गेलं “समृद्धी बंगला”, सात डिसेंबर २०१९ पासून शूटिंग सुरू करायचं ठरलं होतं. त्याच्या आधी सिरीयलचा मॉक mock शूटिंग झालं होतं, Trial shooting, त्यात channel ने माझ्या भाषेवर काही सुधारणा करायला सांगितल्या होत्या . Mock shoot मध्ये मी असं म्हटलं होतं “तू उशिरा का आली” तर तसं न म्हणता “तू उशिरा का आलीस” असं म्हणायला पाहिजे होतं, मग ते सगळं corrections करून पुन्हा शूट करून त्यांना पाठवलं. जरा दडपणच आलं होतं , पण अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे, कुलदीप पवार, रमेश भाटकर, विजय चव्हाण, डॉक्टर लागू , निळू फुले,अरुण सरनाईक, या सगळ्यांबरोबर काम करतांना जे दडपण आलं होतं त्यापेक्षा हे फारच कमी होतं”
मिलिंद गवळी यांनी पुढे लिहिलं “२३ डिसेंबर २०१९ मध्ये पहिला एपिसोड मोठ्या पडद्यावर राजेनशाही आणि पूर्ण टीम बरोबर आम्ही सगळ्यांनी समृद्धी बंगल्यातच एकत्र बघितला आणि राजनशाहींनी माझ्या कामाचं खूप कौतुक केलं. तेव्हा कुठे मनाला बरं वाटलं, पण दडपण मात्र काही कमी झालं नव्हतं , आता त्या गोष्टीला चार वर्षे होऊन गेले आहेत तरीसुद्धा कामाचं एक वेगळं दडपण असतंच. आज १२५० एपिसोड शूट करत असताना सुद्धा सिनच्या आधी थोडा दडपण आलं म्हणून, त्याच समृद्धी बंगल्याच्या अंगणात फेऱ्या मारत असताना आमच्या राजू शिलू का आणि हा माझा व्हिडिओ काढला. मग माझा आवडता गाणं त्या व्हिडिओमध्ये टाकला आणि ही पोस्ट तयार केली.”