मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे सोशल मीडियावर अनेकदा सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. यापैकीच एक अभिनेते म्हणजे मिलिंद गवळी. आजवर अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणारे मिलिंद गवळी सोशल मीडियावरही तितकेच सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे ते अनेकदा त्यांच्या भावना व्यक्त करताना दिसतात.

अशातच मिलिंद गवळींनी Telly Gappa शी साधलेल्या संवादात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं. याबद्दल ते म्हणाले, “ट्रेनमधून पडून पाच माणसे पडतात, ती मरतात. तेव्हा मला दुख होतं आणि ते दु:ख मी कुणाला सांगणार नाही. पण मला वाईट वाटतं. आज गरीबाचा पोरगा गेला, पण माझंसुद्धा कोणी तरी असू शकतं ना? मग मी व्यक्त होतो की, का आपल्याकडे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास आणि थर्ड क्लास आहे.”

यापुढे ते म्हणतात, “स्वातंत्राच्या काळात ब्रिटीशांनी थर्ड क्लास काढला होता. ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते, आपण त्यांचे गुलाम होतो. पण आता ते गेल्यानंतर आपण गुलाम नाहीय ना… आपण स्वतंत्र झालो ना? मग आपणच आपल्या नागरिकांना दुय्यम स्थान का देत आहोत? त्याच्या बापाकडे कमी पैसे आहेत, म्हणून तो सेकंड क्लासचा आहे, असं म्हणण्याचा अधिकार कोणी दिला. नाही… तो भारतीय आहे. तुम्ही जेव्हा रेल्वे किंवा सार्वजनिक वाहतूक बनवता तेव्हा सगळ्यांना समान हक्क द्या ना… सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये तरी भेदभाव करु नका…नका ना लटकत जायला देऊ…”

यापुढे मिलिंद गवळी म्हणतात, “बारा डब्ब्यांची गाडी आहे, तर ती चोवीस डब्ब्यांची करा. काहीतरी करा. मला रेल्वेमधल्या नेमक्या समस्या माहीत नाही. पण तुम्हाला ७०-७५ वर्षांत त्या समस्या सोडवता आल्या नाहीत? दुसऱ्या देशांनी त्या समस्या सोडवल्या आहेत. तुमच्या देशात ते जमत नाही. तुम्ही एखादा रस्ता बनवत असता, तेव्हा टेंडर काढा. त्यातून पैसे खा… ८० रुपये तुम्ही आपापसात वाटून घेता आणि २० रुपयांचा रस्ता करता; तर त्यात खड्डे पडणारच ना…”

मिलिंद गवळी इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे ते असं म्हणतात, “मला यात पडायचं नाही. उद्या मी यांची नावे घेतली; तर हे मला काम करून देणार नाहीत. अभिनय करणे माझं काम आहे; पण अभिनय करतो म्हणून मला मन नाही असं नाही. माझ्या देशातला माणूस मरतो; तेव्हा मला दु:ख होतंच. ते दु:ख मला व्यक्त करायचं असतं. ते दु:ख मला राज्यकर्त्यांना व्यक्त करायचंच नाही, ते त्यांच्यापर्यंत पोहोचणारच नाही. कारण ते इतके निगरगट्ट झाले आहेत की, त्यांना वाटतं फक्त तेच देशभक्त आहेत आणि तेच समाजसेवा करतात.”

यापुढे ते म्हणाले, “मला त्यांना सांगावसं वाटतं की, एखाद्याने रेल्वेने प्रवास करावा. मग तुम्हाला रेल्वेने प्रवास करणाऱ्यांचा त्रास कळेल. कारण आपले देशात अनेकांना रेल्वेने प्रवास करण्यावाचून पर्यायच नाही. अर्थात यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण आता इतका गुंता झाला आहे की, तो गुंता सोडवण्याची गरज आहे.”