गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक मराठी कलाकार हे सोशल मीडियावर सक्रीय असल्याचे पाहायला मिळते. अनेकदा विविध विषयांवर ते भाष्य करतानाही दिसतात. नुकतंच मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये झळकणाऱ्या एका अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट करत त्याचे गाऱ्हाणे मांडले आहे. त्याची ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता ओमकार कर्वे हा सोशल मीडियाव कायमच सक्रीय असतो. सध्या तो गाथा नवनाथांची या मालिकेत झळकताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी तो शिवप्रताप गरुडझेप या चित्रपटातही झळकला होता. नुकतंच ओमकारने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टॅग केले आहे.
आणखी वाचा : “मी ‘पावनखिंड’साठी दाढी, मिशी वाढवली होती, पण दिग्पाल दादाने…” विराजस कुलकर्णीचा गौप्यस्फोट

“तुमची काम व्हायला एकतर तुमच्याकडे भरपूर पैसे हवेत किंवा राजाश्रय हवा किंवा काम करून देणाऱ्या व्यक्तीचा त्यात फायदा हवा किंवा तुम्ही कोणाच्या मर्जीतले असायला हवे. नाहीतर घंटा कोणी विचारात नाही तुम्हाला कितीही योग्य असलात तरी”, अशी पोस्ट त्याने फेसबुकवर केली आहे. त्याबरोबर त्याने ‘…. आलेल्या अनुभवांवरून’ असे लिहित देवेंद्र फडणवीसांना टॅग केले आहे.

आणखी वाचा : “त्यावेळी मी ब्रेड पाण्यात बुडवून खायचो कारण…” मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग

ओमकारच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याला सहमती दर्शवली आहे. मी त्यांच्या प्रक्रियेनुसार सर्व गोष्टी केल्या आहेत, मात्र आता या प्रणालीपुढे मी हात टेकले आहेत, असे ओमकारने एका कमेंटला उत्तर देताना म्हटले आहे.

दरम्यान ओमकारचे नेमकं काय काम अडकले आहे, याबद्दल त्याने कोणताही खुलासा केलेला नाही. पण गेल्या काही वर्षांपासून तो सेंद्रीय शेती करतो. त्यामुळे त्याचे शेती व्यवसायसंबंधित काहीतरी काम अडकले असावे असा अंदाज वर्तवला जात आहे.