स्टार प्रवाहरील काही लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणजे ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका. कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. तसंच मालिकेतील मुक्ता-सागर या मुख्य पात्रांबरोबरच सावनी, सई, इंद्रा कोळी, मिहीर आणि मिहिका या सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. या मालिकेतील सर्व कलाकार सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियाच्या माध्यामातून ही कलाकार मंडळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घडामोडी शेअर करत असतात.
अशातच मालिकेतील मिहीका म्हणजेच अभिनेत्री अमृता बनेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. अमृताची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अमृताने तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ही पोस्ट शेअर केली आहे. आई-वडिलांचा फोटो शेअर करत तिने त्यांच्याबद्दल एक विशेष पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमृता म्हणते, “एखादी गोष्ट जमत नाही तरीही हार न मानता करतं राहणं हे अवघड आहे. तोच तोचपणा आला तरी सातत्य आणि वचन यांना प्रामाणिक राहणं हे त्यापेक्षा अवघड आहे.”
पुढे ती म्हणते, “दोन भिन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करणं आणि ते टिकवणं हे सगळ्यात जास्त अवघड आहे असं मला वाटतं. असे हे दोघे ६ जून १९८३ ला लग्न बंधनात अडकले. रीतसर अरेंज मॅरेज करून आज ४२ वर्ष दोघे संसार करत आहेत. ही वर्ष ऐकून असं वाटतं की किती वेळा दोघांना एकमेकांचा राग आला असेल, चिडचिड झाली असेल, एका क्षणात एकमेकांचा तिरस्कार वाटला असेल. थोडक्यात दोन व्यक्तींना विभक्त करायला लावणाऱ्या सगळ्या गोष्टी वाटून झाल्या असतील.”
यानंतर तिने असं म्हटलं की, “पुराचं पाणी आता ओसरूनही गेलं असेल; पण अशी काय गंमत आहे ना या पिढीमध्ये की एकमेकांबरोबर उभं राहिल्यावर पाय खोल मुळांशी इतके घट्ट रोवलेले असतात की छोट्या मोठ्या भांडणांनी किंवा सो कोल्ड ‘एकमेकांचा ईगो’ हर्ट होऊनही हे डगमगत नाहीत किंवा एकमेकांची साथ सोडत नाहीत. म्हणूनच कदाचित त्यांचा डेरेदार वटवृक्ष तयार होतो आणि त्यांना आई बाबा असं म्हणतात. त्यांच्या छायेत एखाद्या डेरेदार वटवृक्षासारखी सावली मिळते, त्यांच्या पारंब्यांवर मनसोक्त बागडता येतं, उन्हाची झळ बसत नाही.”
यानंतर तिने आई-बाबांविषयी भावना व्यक्त करत म्हटलं, “आमच्यासाठी असा वटवृक्ष म्हणजे आमचे मम्मी-पप्पा. जो वटवृक्ष फक्त स्वतः वाढत नाही; तर आपल्या मुळांशी पुन्हा कसं जोडलं जावं हे सुद्धा शिकवत असतो. माझ्या दोन्ही ताई आणि मी… आम्हाला तुम्ही आमचे आई-बाबा म्हणून लाभलात याचा नेहमीच अभिमान आहे. तुमच्या सारख्या डेरेदार वृक्षाची सावली आम्हाला मिळत असताना त्या सावलीत आम्ही आमची मूळं खोलवर रुजवण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न कायम करत राहू इतकंच सांगेन.”
दरम्यान. अमृताच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती छोट्या पडद्यावरील मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. तिने झी मराठीकरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतही काम केलं आहे. तिच्या सन मराठीवरील ‘कन्यादान’ मालिकेला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. ‘कन्यादान’शिवाय तिने ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतही काम केलं आहे. सध्या ती ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.