आजवर आपण मालिकेच्या कथानकात आलेले लीप पाहिले आहेत. लीप म्हणजे एखाद्या मालिकेचं कथानक ५ ते ६ वर्षांनी पुढे सरकतं. ‘स्टार प्रवाह’च्या ‘मुरांबा’ मालिकेत काही दिवसांपूर्वीच लीप आल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं. मात्र, आता या वाहिनीवर एक अनोखा प्रयोग करण्यात येईल. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच एका मालिकेत प्रेक्षकांना फ्लॅशबॅक पर्व पाहायला मिळेल. ही मालिका कोणती आहे आणि यामध्ये नेमका काय ट्विस्ट येईल जाणून घेऊयात…

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेचं कथानक फ्लॅशबॅकमध्ये म्हणजेच बारा वर्षांनी मागे जाणार आहे. जानकी-ऋषिकेशच्या संसाराची गोष्ट आपण मालिकेच्या पहिल्या भागापासून पाहत आलो आहोत. पण, जानकी-ऋषिकेशची भेट नेमकी कशी झाली? पहिली भेट ते लग्न हा प्रवास नेमका कसा होता? या प्रवासात नेमका कसा चढउतार होता? याची रंजक गोष्ट मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

सध्या ऋषिकेश-जानकी आणि संपूर्ण रणदिवे कुटुंबाच्या आयुष्यात ऐश्वर्या आणि मास्कमॅन नावाचं वादळ आहे. बारा वर्षांपूर्वी देखील ऋषिकेश-जानकीच्या प्रेमाच्या गोष्टीत मकरंद नावाचं वादळ होतं. हा मकरंद नेमका कोण? ऋषिकेश-जानकीच्या प्रेमात अडथळे आणण्यामागे त्याचा नेमका काय प्लॅन होता…याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये पाहायला मिळणार आहे.

मालिकेतल्या या अनोख्या वळणाबद्दल सांगताना ऋषिकेश म्हणजेच अभिनेता सुमीत पुसावळे म्हणतो, “मालिकेतल्या या नव्या कथानकासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. आजवर मालिकेत प्रेक्षकांनी शांत, संयमी आणि संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलणारा ऋषिकेश पाहिला आहे. पण, १२ वर्षांपूर्वी ऋषिकेशचा स्वभाव फार वेगळा होता. खूप पैलू आहेत या भूमिकेला… बारा वर्षांपूर्वी जानकी-ऋषिकेश नेमके कसे होते हे साकारताना खूप धमाल येणार आहे. आमचे लूक सुद्धा खूप छान झाले आहेत. प्रेक्षकांना हा नवा ट्रॅक नक्की आवडेल याची खात्री आहे. तेव्हा नक्की आमची मालिका बघा”

दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका वाहिनीवर दररोज संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारित केली जाते. आता या फ्लॅशबॅक पर्वाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.