कपिल शर्माच्या शोमुळे ओळखली जाणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती हिने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांचा वाईट अनुभव सांगितला आहे. गाडी अडवून आंदोलकांनी जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या, असा दावा तिने केला आहे. दक्षिण मुंबईत दिवसाढवळ्या गाडीत असताना आलेल्या अनुभवानंतर कायदा व सुव्यवस्थेबद्दल तिने प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच आंदोलनाच्या नावाखाली आंदोलक मुंबई दर्शन करत असल्याचं तिने पोस्टमध्ये लिहिलं आहे.

सुमोना चक्रवर्तीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून घडलेला प्रकार सांगितला आहे. कुलाब्याहून फोर्टला येताना हा अनुभव आला असं ती म्हणाली. आपण सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहोत असं वाटत नाही.
आपला समजार प्रगतीशील आहे, असं वाटत नाही.
ते ज्या डिजिटल भारताबद्दल बोलत असतात तो हा नाही.
कारण जेव्हा जातीयवाद, धर्म, राजकारण, भ्रष्टाचार, नोकरशाही, निरक्षरता आणि बेरोजगारीचा शो सुरू असतो तेव्हा तो विकास नाही तर विनाश असतो, असं कॅप्शन सुमोनाने पोस्टला दिलंय.

सुमोना चक्रवर्तीने लिहिलं, “आज दुपारी १२:३० वाजता मी कुलाब्याहून फोर्टला गाडीने येत होते आणि अचानक जमावाने माझी गाडी अडवली. गळ्यात भगव्या रंगाचा पंचा असलेला एक माणूस माझ्या गाडीच्या बोनेटवर चढला आणि माझ्याकडे पाहून कुत्सित हसला. तो माझ्यासमोर विचित्र हावभाव करत होता. त्याचे इतर साथीदार गाडीच्या खिडक्या ठोठावून “जय महाराष्ट्र!” असे ओरडत होते आणि हसत होते. आम्ही थोडं पुढे गेल्यावर पुन्हा तेच घडलं म्हणजे ५ मिनिटांत दोनदा, हा प्रकार घडला.

पोलीस तिथे नव्हते. (जे पोलीस आम्ही नंतर पाहिले ते फक्त निवांत बसले होते, गप्पा मारत होते.) कायदा आणि सुव्यवस्था नाहीच.

मला माझ्या गाडीत, दिवसाढवळ्या, दक्षिण मुंबईत – असुरक्षित वाटतंय.

आणि रस्ते? केळीच्या साली, प्लास्टिकच्या बाटल्या, घाणीचे ढीग. फुटपाथवर जागा नाही. आंदोलनाच्या नावाखाली आंदोलक जेवत आहेत, झोपत आहेत, आंघोळ करत आहेत, स्वयंपाक करत आहेत, लघवी करत आहेत, व्हिडीओ कॉल करत आहेत, रील बनवत आहेत, मुंबई दर्शन करत आहेत. सगळे सिव्हिक सेन्सची खिल्ली उडवत आहेत.

पाहा पोस्ट –

मी बरंच आयुष्य मुंबईत घालवलंय. मला इथे खासकरून दक्षिण मुंबईत खूपच सुरक्षित वाटतं. पण आज इतक्या वर्षांत पहिल्यांदाच, माझ्या स्वतःच्या गाडीत असतानाही दिवसाढवळ्या मला खरंच असुरक्षित वाटलं. बरं झालं की माझा एक मित्र माझ्याबरोबर गाडीत होता. जर मी एकटी असते तर काय??? हा विचारही मनात येऊन गेला.

मला व्हिडीओ रेकॉर्ड करायचा होता, पण मग विचार आला की यामुळे ते आणखी भडकू शकतात, त्यामुळे व्हिडीओ रेकॉर्ड केला नाही.

तुम्ही कोण आहात किंवा तुम्ही कुठे आहात तरी कायदा आणि सुव्यवस्था काही सेकंदात कोसळू शकते हे लक्षात येतं तेव्हा तो भयंकर अनुभव असतो. शांततेत आंदोलनं होतात, हे आपण पाहिलं आहे. आणि तरीही, पोलीस त्यांच्यावरच कारवाई करतात. पण इथे? पूर्णतः अराजकता माजली आहे.

कर भरणारी नागरिक म्हणून, एक महिला म्हणून आणि या शहरावर प्रेम करणारी व्यक्ती म्हणून, मी अस्वस्थ झाले आहे. प्रशासन आणि नागरी जबाबदारीची अशी थट्टा करण्यापेक्षा आपण चांगल्या गोष्टी डिझर्व्ह करतो. आपल्या स्वतःच्या शहरात सुरक्षित वाटण्याचा आपल्याला अधिकार आहे,” अशी पोस्ट सुमोना चक्रवर्तीने केली आहे.