छोट्या पडद्यावरील मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आणि प्रेक्षक त्या मालिकेवर भरभरून प्रेम करू लागतात. काही दिवसांनी मालिकेचं कथानक आणि पात्रं ही चाहत्यांच्या जवळची होऊन जातात. मालिकेचा चाहतावर्ग हा मालिकेवर भरभरून प्रेम करत असतो. मात्र मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार अशी बातमी समोर येते आणि मग प्रेक्षकांना धक्काच बसतो. असंच एका लोकप्रिय मालिकेबद्दल झालं आहे.
झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अपेक्षित टीआरपी मिळत नसल्यानं ही मालिका निरोप घेणार आहे, असे कारण समोर आले. ही मालिका बंद होऊ नये म्हणून चाहत्यांनी सोशल मीडियावर मालिका बंद होऊ नये म्हणून जोरदार मागणीही केली होती. पण अखेर कलाकारांकडूनच मालिकेच्या निरोपाबद्दल शिक्कामोर्तब करण्यात आलं.
काही महिन्यांपूर्वी मालिका सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्याच्या आतच बंद झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र नव्याने आलेल्या मालिकांमुळे हा प्रकार बंद झालेला. यापैकी ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका होती. आता कुठे मालिकेतील एजे व लीला यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत होती. प्रेक्षक या जोडीच्या प्रेमात पडत असतानाच मालिका बंद होणार असल्याचे समोर आले.
मालिकेच्या निरोपाबद्दल कलाकारांनी त्यांच्या भावुक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशातच मालिकेतील लीला म्हणजेच मुख्य अभिनेत्री वल्लरी विराजनेही भावुक पोस्ट शेअर केली आहे. वल्लरीने पडद्यामागील खास क्षण शेअर केले आहेत. मालिकेत एकमेकींच्या विरोधात असलेल्या सुना आणि ती फोटोंमध्ये मात्र एकत्र असल्याचं पाहायला मिळत आहे. हे फोटो शेअर करत तिने “एका सुंदर प्रवासाचा शेवट होत आहे” असं म्हटलं आहे.
झी मराठीवरील ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेसह आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, ती म्हणजे अधिपती व अक्षरा यांची ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका. याबद्दल स्वत: कविता मेढेकर यांनी खुलासा केला. दरम्यान, या दोन्ही मालिकांना चांगलीच प्रेक्षक पसंती होती. पण आता आवडीच्या मालिका बंद होत असल्याने चाहते काहीसे नाराज आहेत हे नक्की.
‘नवरी मिळे हिटलरला’बद्दल सांगायचं झालं तर, मालिकेत वल्लरी आणि राकेश बापट हे मुख्य भूमिकांत होते. या दोघांशिवाय माधुरी भारती, शर्मिला शिंदे, सानिका काशीकर, भूमिजा पाटील, भारती पाटील, प्रसाद लिमये अशा अनेक कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. शेवटच्या भागाचं शूटिंग नुकतंच पार पडलं असून मालिकेचा शेवट लीलाचं डोहाळेजेवण साजरं करून गोड होईल.