संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) केंद्र सरकारने सोमवारी लागू केला. त्यासंदर्भातील अधिसूचना काढण्यात आली असून लोकसभा निवडणुकीसाठी महिनाभराचा कालावधी उरला असताना केंद्राने हा अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये ‘सीएए’विरोधात देशभर हिंसक आंदोलने झाली होती. त्यावेळी बऱ्याच सेलिब्रिटीजनीदेखील याला चांगलाच विरोध केला होता.

आता हा कायदा लागू झाल्यावर तमिळ अभिनेता आणि ‘तमिलागा वेट्री कडगम (टीवीके)’ पार्टीचा नेता थलपति विजय याने सीएए विरोधात भाष्य केलं आहे. ट्विटरवर शेअर केलेल्या निवेदनात थलपथी विजय म्हणाला की, “सीएएची अंमलबजावणी मान्य नाही. ज्या वातावरणात देशातील सर्व नागरिक सामाजिक एकत्र आनंदाने रहात आहेत, तेथे भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ (CAA) सारख्या कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी आम्हाला मान्य नाही.”

आणखी वाचा : ‘JNU’वर लवकरच येणार चित्रपट; रवी किशन आणि उर्वशी रौतेला यांच्या आगामी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

हा कायदा तामिळनाडूमध्ये लागू करू नये, अशी विनंती विजयने तामिळनाडू सरकारला केली. या कायद्याची तामिळनाडूमध्ये अंमलबजावणी होणार नाही याची राजकारण्यांनी खात्री करावी, असेही विजयने त्याच्या निवेदनात नमूद केले आहे. विजय व्यतिरिक्त, इतर विरोधी नेत्यांनीही नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याचे नियम अधिसूचित केल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली आहे. तसेच भाजप निवडणुकांपूर्वी समाजात फूट पाडण्याचा आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री यांनीही या कायद्याचा विरोध केला आहे. भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणूक जाहीरनाम्यात ‘सीएए’चे आश्वासन दिले होते. त्यानुसार, २०२४ च्या निवडणुकीआधी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी, लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभर ‘सीएए’ लागू केला जाणार असल्याचे जाहीर केले होते. सीएएमुळे देशातील मुस्लिमांना लक्ष्य केले जाण्याचा धोका असल्याचा मुद्दा उपस्थित करत विविध राज्यांमध्ये या कायद्याला तीव्र विरोध झाला होता. देशभर हिंसक विरोध होऊ लागल्यामुळे केंद्र सरकारने कायद्याची अंमलबजावणी लांबणीवर टाकली होती.