मनोरंजनाची खमंग मेजवानी असलेला टाइमपास-३ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या दोन्ही भागाने प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन केले. त्यानंतर आता लवकरच ‘टाईमपास -३’ ची टीम प्रेक्षकांना पोटभर हसवण्यासाठी सज्ज झाली आहे. चाहत्यांचा आवडता दगडू तोच असला तरी या भागात प्रेक्षकांना यात एक नवी लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. टाइमपास ३ हा चित्रपट येत्या २९ जुलैला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या टीमने ‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’ला हजेरी लावली. यावेळी दिग्दर्शक रवी जाधव, अभिनेता प्रथमेश परब, अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि अभिनेते संजय नार्वेकर यांनी मनसोक्त गप्पा मारल्या.

अभिनेते संजय नार्वेकर हे नाव मराठी इंडस्ट्रीप्रमाणेच बॉलिवूडमध्येही तितकंच प्रसिद्ध आहे. संजय नार्वेकर यांनी आतापर्यंत अनेक नाटक आणि चित्रपट याद्वारे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले. टाइमपास ३ या चित्रपटात संजय नार्वेकर यांनी मनोहर पाटील ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेचे सध्या सर्वत्र कौतुक केले जात आहे. लोकसत्ताच्या डिजीटल अड्डामध्ये संजय नार्वेकर त्यांना त्यांच्या भूमिकेबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. तुम्ही आयुष्यात केलेला टाईमपास कोणता? आणि आता वेळ मिळाला की टाईमपास म्हणून काय करता? असा प्रश्न संजय नार्वेकरांना विचारण्यात आला. त्यावर त्यांचे उत्तर ऐकून सर्वांनाच धक्का बसला.

“मी टाईमपास म्हणून लग्न केलं आणि आता ते मी माझे करिअर म्हणून जोपासतो आहे. ते आणखी वाढवायचा प्रयत्न करत आहे”, असे संजय नार्वेकर यांनी या प्रश्नाला उत्तर देताना म्हटले. त्यांचे हे गंमतीशीर उत्तर ऐकून सगळेजण जोरजोरात हसू लागले.

दरम्यान दरम्यान ‘टाइमपास’ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू-प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या भागात बालपणी एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट आता टाइमपास ३ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या २९ जुलैला झी स्टुडिओजच्या माध्यमातून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच या चित्रपटाचं दिग्दर्शन रवी जाधव यांचं आहे. याद्वारे प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे ही जोडी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.