प्रेमाची भाषा वेगळीच असते. ती सांगायला शब्द लागत नाहीत. प्रेम करणाऱ्यांना एकमेकांच्या नजरेतून प्रेम जाणवते. यावरच ‘प्रेम हे’ मालिकेची पुढील कथा आधारित आहे. ही गोष्ट आहे दोन अशा लोकांची ज्यांचे स्वतःचे आयुष्य एका वळणावर येऊन थांबले आहे. ईशा आणि प्रसाद यांच्यातील दुवा आहे प्रसादचे पाळणाघर आणि ईशाचा मुलगा अद्वैत. प्रेम कधी, कोणामध्ये आणि कोणत्या वळणावर होईल खरंच सांगू शकत नाही. ‘प्रेम हे’ची सोमवारी येणारी नवीन गोष्ट आहे ‘बंध रेशमाचे’. सुनील बर्वे आणि वीणा जामकर यांच्या तगड्या अभिनयाने सजलेली एक सुंदर निरागस प्रेमकथा येत्या सोमवार आणि मंगळवार तुम्हाला पाहायला मिळेल.

ईशा एक स्वावलंबी स्त्री. अॅडव्हर्टायजिंग प्रॉफेशनल. नवऱ्याबरोबर घटस्फोट झाल्यानंतर ती तिचा मुलगा अद्वैत याच्याबरोबर नवीन शहरात राहायला येते. अद्वैत लहान असल्यामुळे कामाला जाताना मुलासाठी ती घराजवळच एक पाळणाघर शोधते. या पाळणाघराचा मालक असतो प्रसाद रणदिवे. एक अविवाहित पण हसतमुख, लहान मुलांमध्ये रमणारा,  पाळणाघर व्यवसाय म्हणून न पाहणारा, ४०-४५ वयातील माणूस. सुरुवातीला ईशाला प्रसादच लहान मुलांसारखं वागणं जराही आवडतं नसतं. पण प्रसादबद्दल जवळून जाणून घेतल्यानंतर ती त्याच्या प्रेमात पडू लागते. पण घटस्फोटित ईशा आणि अविवाहित प्रसाद यांच्यात अजूनही काही असतं ज्यामुळे ही गोष्ट वेगवेगळी वळणं घेते. ईशा आणि प्रसादचे प्रेम फुलते की खोट्या समाजासमोर झुकते. हे सर्व पाहण्यासाठी ‘प्रेम हे’ या मालिकेतील ‘बंध रेशमाचे’ ही गोष्ट पाहणे नक्कीच उत्कंठावर्धक ठरेल.

veena-jamkar-sunil-barve-1

‘बंध रेशमाचे’ ही झी युवाची संकल्पना असून, सुनील बर्वे आणि वीणा जामकर हे मुख्य भूमिकेत आहेत, तर गणेश पंडित यांच्या लेखणीतून ही कथा साकारली आहे. या गोष्टीचे दिग्दर्शन प्रवीण परब यांनी केले आहे.