अभिनेत्री कंगना रणौतच्या १९४७ चं स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं आहे या विधानाचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार मिळावा म्हणून ही तडफड चालली असल्याची टीकाही गोखले यांच्यावर अनेकांनी केली. त्यांच्या या टीकेला गोखले यांनी आज प्रत्युत्तर दिलं.
कंगनाच्या विधानाचं समर्थन केल्याप्रकरणी निर्माण झालेल्या गदारोळासंदर्भात विक्रम गोखले यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्या टीकाकारांना तसंच ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिलं आहे. सरकारकडून पुरस्कार मिळावा म्हणून गोखले अशा प्रकारे कंगनाच्या विधानाचं समर्थन करत असल्याच्या टीकेल्या प्रत्युत्तर देताना गोखले म्हणाले, “असं बोलणं म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. मी कोणाला बांधील नाही. पुरस्कारासाठी तडफड करत आहे, असं म्हणणाऱ्यांना मला सांगायचं आहे की मला कोणताही पुरस्कार नकोय. माझ्या आयुष्यातली २० वर्षे मी पुरस्कार फेटाळण्यात घालवली आहे. या क्षेत्रात मी आणि बॉलीवूडमधली एक व्यक्ती असे आम्ही दोघेच आहोत जे पुरस्कार फेटाळत आहेत”.
हेही वाचा – विक्रम गोखलेंनी सांगितलं कंगना रणौतला समर्थन देण्यामागचं कारण; म्हणाले, “ते मुळीच…”
आपल्या वडिलांविषयीची आठवण सांगताना गोखले म्हणाले, “एकदा एका मुलाखतीत माझ्या वडिलांना विचारलं की, तुम्हाला पुन्हा जन्म घ्यायला आवडेल का? त्यावर ते म्हणाले की, मला पुन्हा जन्म घ्यायचा नाही. पण मला जर माणसाचा जन्म मिळाला तर मला माझा थोरला मुलगा विक्रमच्या पोटी जन्माला यायला आवडेल. आणि टीकाकारांना मी सांगू इच्छितो, हाच माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. पुरस्कारासाठी, सारखं प्रकाशात येण्यासाठी प्रयत्न करण्याचं माझं वयही नाही आणि मला त्याची गरजही नाही”.