‘शार्क टँक इंडिया’चं दुसरं पर्व आज सुरू होणार आहे. आजपासून पुन्हा स्टार्ट-अप विश्व आणि त्यात काम करणारी, धडपडणारी लोक पुन्हा पहायला मिळणार आहेत. पूर्वीप्रमाणेच जुन्या पर्वातील शार्क्ससुद्धा यासाठी सज्ज आहेत. सर्वात जास्त लोकप्रिय असा शार्क म्हणजे अशनीर ग्रोव्हरची कमतरता यावेळी भासणार आहे. अशनीर या नव्या पर्वाचा भाग नसल्याने बरेच चाहतेसुद्धा निराश आहेत.

सध्या अशनीरचा एक जुना व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अशनीरने त्याच्या कंपनीसाठी नेमकी कशी मेहनत घेतली आहे याबद्दल खुलासा केला आहे. या कंपनीसाठी अशनीरने बॉलिवूडचा दबंग सलमान खानकडे प्रमोशनसाठी विचारणा केली होती. अशनीरच्या ‘भारतपे’ या कंपनीने कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळवली. या कंपनीचा ब्रॅंड अंबेसेडर सलमान खानला करावं अशी अशनीरची इच्छा होती.

आणखी वाचा : रणबीरच्या ‘ॲनिमल’ची जबरदस्त चर्चा; दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासनेही पोस्टर शेअर करत दिली प्रतिक्रिया

या व्हिडिओमध्ये अशनीरने त्याच्या याच अनुभवाबद्दल खुलासा केला आहे. जेव्हा अशनीरकडे १०० कोटीची गुंतवणूक होती तेव्हा त्याने सलमान खानच्या टीमकडे विचारणा केली, तेव्हा या मार्केटिंग कॅम्पेनसाठी सलमानच्या टीमने तब्बल ७.५ कोटीची मागणी केली. केवळ सलमानला घेणं एवढंच काम नव्हतं, तर त्यासाठी कॅम्पेन डिझाईन करणं, जाहिरातीचं चित्रीकरण करणं, त्या जाहिराती प्रदर्शित करणं या सगळ्यासाठी तब्बल २० कोटी लागणार आहेत हा अंदाज आधीच अशनीरने लावला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर अशनीरने सलमानशी घासाघिस करून त्याला ४.५ कोटी मानधनासाठी राजी केलं. अशनीर जेव्हा सलमानच्या मॅनेजरशी पैशासंदर्भात बोलणी करत होता तेव्हा त्या मॅनेजरने अशनीरला विचारलं, “अरे आणखी किती कमी करणार पैसे, तू भाजी घ्यायला आला आहेस का?” अखेर सलमान यासाठी तयार झाला आणि २०१९ साली सलमान खान ‘भारतपे’चा चेहेरा बनला.