बुलेट ट्रेनला प्राधान्य देणाऱ्या महाराष्ट्र सरकारने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या नियोजित कराड ते चिपळूण रेल्वे मार्गाबाबत हात आखडता घेतला का, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या कराड ते चिपळूण रेल्वे मार्गासाठी ऑगस्ट २०१६ मध्ये महाराष्ट्र सरकारने करार केला होता. यानुसार शापुनजी पालनजी या बांधकाम क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीकडे काम सोपविण्यात आले होते. गेल्या वर्षभरात या प्रकल्पाबाबत काहीच प्रगती झालेली नाही. अलीकडेच या मार्गाचे काम थांबविण्यात आल्याची चर्चा ऐकायला येत आहे. तसे झाल्यास कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रेल्वे मार्ग प्रत्यक्षात येऊ शकणार नाही असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. प्रभूंना शिक्षा का? बुलेट ट्रेनची सर्व प्रक्रिया तात्काळ पूर्ण व्हावी म्हणूनच रेल्वेमंत्री पदावरून सुरेश प्रभू यांना हटविण्यात आल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. बुलेट ट्रेन प्रकल्प व्यवहार्य ठरेल की नाही याबाबत साशंकता आहे. प्रभू यांच्याकडील खाते का बदलण्यात आले हे जनतेला समजले पाहिजे, असेही मत चव्हाण यांनी व्यक्त केले.