कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने या प्रकल्पात निर्माण झालेल्या तांत्रिक गफलतींमुळे स्कायबस मेट्रोचा संपूर्ण प्रकल्प मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांनी मंगळवारी पत्रकारांना ही माहिती दिली. या प्रकल्पात निर्माण झालेल्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी आणखी १०० कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. हा खर्च करण्याची आमची तयारी नाही, अशी स्पष्ट भूमिका तायल यांनी मांडली.
कोकण रेल्वेने नव्वदच्या दशकात शहरातील अंतर्गत दळणवळणासाठी स्कायबस मेट्रोच्या प्रकल्पाचे तंत्रज्ञान विकसित केले. भारतीय बनावटीचे हे तंत्रज्ञान देशातील प्रमुख महानगरांमधील प्रवासी सेवेचा उत्तम पर्याय ठरेल, असा दावा कोकण रेल्वेमार्फत करण्यात आला. मुंबई, पुणे, नागपूर, त्रिवेंद्रम यांसारख्या मोठय़ा शहरांमध्ये हा प्रकल्प उभा केला जावा, असा प्रस्तावही कोकण रेल्वेने राज्य सरकारना पाठविला. तसेच त्या-त्या शहरांमधील स्थानिक प्राधिकरणांसोबत वाटाघाटीही सुरू केल्या. ठाणे शहरात स्कायबस मेट्रोचा प्रकल्प उभा केला जावा, अशा स्वरूपाचा प्रस्ताव जवळपास अंतिम टप्प्यात आला होता.
महापालिकेने या प्रकल्पाच्या अंमलबजावणी तत्त्वत: मंजुरीही दिली. मात्र, राज्य सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखविला नाही. या काळात गोवा सरकारने कोकण रेल्वेला मडगाव येथे प्रयोगिक तत्त्वावर स्कायबस मेट्रोचा मार्ग उभा करण्याची परवानगी दिली. त्यानुसार टेस्ट ट्रॅक तयारही करण्यात आले. मात्र, या मार्गावर चाचणी करताना काही ठिकाणी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. चाचणी दरम्यान काही वेळा अपघातासारखी परिस्थिती उद्भवली. त्यानंतर या प्रकल्पाभोवती अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले. दरम्यानच्या काळात मडगांव येथील प्रायोगिक मार्गासाठी कोकण रेल्वेने खासगी भागीदार शोधण्याचा प्रयत्न करून पाहिला. यामध्ये स्कायबस डब्यांची खरेदी तसेच अन्य सहयोगी वस्तूंचा समावेश करण्यात आला. मात्र, या निविदांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. हा प्रकल्प तांत्रिकदृष्टय़ा फारसा सुरक्षित नाही, असे चित्र निर्माण झाल्याने त्यातील दोष दूर करण्यासाठी कोकण रेल्वेने तज्ज्ञ अभियंत्यांची एक समिती नेमली.
 एव्हाना स्कायबसच्या निर्मितीवर ५० कोटी रुपयांचा खर्च झाला होता. या समितीने स्कायबसमधील तांत्रिकी त्रुटी दूर करण्यासाठी काही सुधारणा सुचविल्या. त्यासाठी सुमारे १०० कोटी रुपये खर्च येईल, असे प्रस्तावित केले. हा निधी कसा उभा करायचा या विवंचनेत असलेल्या कोकण रेल्वेने संपूर्ण प्रकल्प मोडीत काढण्याचा निर्णय घेतला आहे.