उद्धव ठाकरे यांचा हस्तक्षेप; नाराज असलेल्या आमदार काते यांच्या मागण्यांबाबत आज बैठक

शिवसेनेत खासदार, आमदार व नेत्यांमध्ये भांडणे वाढली असून मंत्री, सचिव आदींविरोधात नाराजी आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना हस्तक्षेप करावा लागत असून त्यांचे खासगी सचिव मिलींद नार्वेकर यांच्याविषयीही ठाकरे यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. संघटनेतील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांवरुनही नाराजी आहे.

शिवसेनेचे मंत्री आमदार व पदाधिकाऱ्यांची जनतेची कामेही करीत नाहीत, या तक्रारींचा पाढा ठाकरे यांच्यापुढे अनेकदा वाचण्यात आला आहे. त्यांनी मंत्र्यांना सूचना देऊनही त्यात फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे आमदार तुकाराम काते यांनी तीव्र संताप व्यक्त केला. देवनार येथील महापालिका  वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घराबाहेर काढले जात आहे, तर मुक्त मार्गासाठी पुनर्वसन केलेल्यांना मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाकडून घुसखोर ठरविण्यात येत आहे. हे दोन्ही प्रश्न ते अनेक महिने मांडत असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना सांगूनही त्यांनी काहीच न केल्याने काते नाराज आहेत. ठाकरे यांनी त्यांच्याप्रकरणात तातडीने लक्ष घालून त्यांना व संबंधितांना ‘मातोश्री’ निवासस्थानी बोलावून घेऊन सूचना दिल्या आणि रविवारी बैठकही घेणार आहेत.

ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीतही तक्रारींचा पाढा वाचण्यात आला. सचिव खासदार अनिल देसाई, विनायक राऊत व नार्वेकर यांच्याकडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करताना संपर्क प्रमुखांना काहीच कळविले जात नाही किंवा विचारण्यात येत नाही. मात्र निवडणुकीतील विजयाची जबाबदारी मात्र त्यांच्यावर टाकून अपयशाबाबत जाब विचारला जातो. चुकीच्या नेत्यांकडे पदे देण्यात आली, तर त्यांच्याकडून कामगिरी न झाल्यास नियुक्त्या करणाऱ्या नेत्यांवरच निवडणुकीच्या यशापयशाची जबाबदारी टाकायला हवी, असे मत संपर्क प्रमुखांनी ठाकरे यांच्यापुढे व्यक्त केले होते. त्यामुळे आता विभागप्रमुख, तालुकाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्या नियुक्त्या करताना संपर्कप्रमुखांशी चर्चा करुन निर्णय घेण्याची पध्दत अवलंबिण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या आहेत.

परभणीतील खासदार संजय जाधव व आमदार राहुल पाटील यांच्यात मतभेद होते. त्यांनाही मुंबईत पाचारण करुन पर्यावरण मंत्री रामदास कदम व राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे मिटविले. भाजपने २०१९ च्या निवडणुकांसाठी स्वबळावर लढण्याची जोरदार तयारी सुरु केली असताना शिवसेनेत मात्र नेत्यांमधील मतभेद, वाद चव्हाटय़ावर येत आहेत. मंत्र्यांविरुध्दची नाराजी वाढत असून ठाकरे यांनी योग्य निर्णय न घेतल्यास हे मतभेद वाढतच जाण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा  भाजप प्रवेश?

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुका होऊन अवघे तीन आठवडे उलटले नाहीत तोच शिवसेनेतून निवडून आलेल्या दोन नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पेणकर पाडा येथून निवडून आलेले शिवसेनेचे राजू भोईर आणि त्यांच्या पत्नी भावना भोईर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तन येथे बैठकीसाठी आले असताना हा प्रवेश घेतला असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. राजू भोईर यांनी मात्र याचा इन्कार केला असून आपण शिवसेनेत असल्याचा खुलासा भोईर यांनी केला आहे.   पहिली महासभादेखील झालेली नाही. तोच  शिवसेनेचे आणखी एक नगरसेवक कमलेश भोईर यांनीदेखील भाजपमध्ये प्रवेश घेतला असल्याचा दावा आमदार नरेंद्र मेहता यांनी केला आहे.