मुंबई: गोरेगाव येथील आरेच्या जंगलात एप्रिल महिन्यात बेकायदेशीरपणे सोडण्यात आलेल्या कांदिवलीतील २० पैकी ११ भटक्या श्वानांचा शोध घेण्यात प्राणीप्रेमींना यश आले आहे. या ११ श्वानांचे लसीकरण करण्यात आले असून त्यांना पुन्हा कांदिवलीतील मुळ ठिकाणी सोडण्यात आले. तर दोन पिल्लांसह तीन श्वान मृतावस्थेत सापडली असून उर्वरित सहा श्वान बेपत्ता आहेत.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कांदिवलीमधील एका गृहसंकुलातील भटक्या श्वानांना बेकायदेशीरपणे आरेच्या जंगलात सोडण्यात आले होते. जंगलात सोडलेले श्वान संकटात सापडण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्यामुळे आरेतील जैवविविधतेलाही धोका निर्माण होण्याची शक्यता होती. वन्यप्राण्यांचे आरोग्य धोक्यात येऊ नये आणि श्वानांच्या बचावार्थ प्राणीप्रेमींनी शोध मोहीम हाती घेतली होती. मुंबईमधील सुमारे ३५ प्राणीप्रेमी आरेच्या जंगलात या भटक्या श्वानांचा शोध घेत होते.

श्वानांचा आवाज, त्यांच्या पायांचे ठसे आणि त्यांची राहण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी प्राणीप्रेमींनी शोध घेतला. या शोध मोहिमेमध्ये काही श्वान सापडले. यापैकी काही श्वान मृतावस्थेत होते. तर जिवंत सापडलेल्या श्वानांना सुरक्षित ठिकाणी हलवून, त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू होता. स्थानिक नागरिक आणि काही पर्यावरण कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते. दरम्यान, गृहसंकुलात सोडण्यात आलेल्या श्वानांची देखभाल आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पीपल फॉर ॲनिमल्स (मुंबई युनिट) या संस्थेने कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे. जंगलात शोध मोहिमेत सापडलेल्या ११ जिवंत श्वान आणि दोन पिल्लांसह तीन मृत श्वान सापडले. तर सहा श्वान आजही बेपत्ता आहेत. बेपत्ता श्वानांचा आजही शोध घेण्यात येत आहे.

कांदिवली पूर्व येथील एका गृहसंकुलातील श्वानांच्या वाढत्या उपद्रवामुळे काही रहिवासी त्रस्त झाले होते. काही रहिवाशांनी कोणतीही प्रशासकीय परवानगी न घेता तब्बल २० श्वानांना पकडून थेट आरेच्या जंगलात सोडले होते. या घटनेची ध्वनिचित्रफित प्रसारित झाल्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर मुंबईतील प्राणीप्रेमींनी आरेच्या जंगलात सोडलेल्या श्वानांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भटके श्वान आणि मांजरांना इतर परिसरात स्थलांतरित करणे हा कायद्याने गुन्हा आहे. यामुळे रेबीजसारखे संसर्गजन्य आजारही पसरू शकतात. नागरिकांनी असे कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये. श्वानांमुळे त्रास होत असेलच तर यासंदर्भात काम करणाऱ्या संस्थाशी संपर्क साधावा. – रेश्मा शेलटकर, प्राणी प्रेमी, कार्यकर्ता