मुंबई : मुंबईची पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत असून धरणे काठोकाठ भरली तरी मुंबईला पाणी तुटवडा भेडसावत आहे. मुंबईला होणाऱ्या पाणी पुरवठ्यापैकी तब्बल ३४ टक्के पाण्याचा हिशोबच लागत नसल्याचे समोर आले आहे. नॉन रेव्हेन्यू वॉटर अर्थात हिशोबबाह्य पाण्यामुळे मुंबई महापालिकेला महसुलावरही पाणी सोडावे लागत आहे.

पाणी गळती, पाणी चोरी, बिलांमधील त्रुटी यांमुळे या पाण्यावरील महसूल मुंबई महापालिकेला मिळत नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी दिवसेंदिवस मुंबईसाठी अपुरे पडत असताना ३४ टक्के पाण्याचा हिशोब लावणे हेच याचे पालिकेसमोर मोठे आव्हान आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा सातही धरणातून मुंबईला दर दिवशी ४००० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. प्रत्यक्षात मुंबईची पाणीपुरवठ्याची दैनंदिन गरज ४६०० दशलक्ष लिटर आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे सात जलाशयातील पाणी कमी पडू लागले आहे. त्यामुळे पाण्याचे स्रोत वाढवण्यासाठी पालिका प्रशासन विविध प्रकल्प आखत आहे. मात्र एकाबाजूला असलेल्या पाण्यापैकी ३४ टक्के पाणी हे पालिकेच्या हिशोबाबाहेर आहे.

या हिशोबबाह्य पाण्याबाबत मुंबई महापालिकेचे जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले, पाणी गळती, पाणी चोरी, बिलांमधील किंवा मीटरमधील त्रुटी यांमुळे ३४ टक्के पाण्याचा हिशोब लागत नाही. पाणी गळती व्यतिरिक्त अनेक ठिकाणी झोपडपट्ट्यांमध्ये जलवाहिन्यांमधून पाणी चोरी होते. कधी पाण्याच्या मीटरमध्ये बिघाड असल्यास बिलांमध्ये त्रुटी निर्माण होतात. त्यामुळे ३४ टक्के पाणी हे हिशोबबाह्य आहे. त्याचे प्रमाण हे काही वर्षांपूर्वी ३८ टक्के होते ते गेल्या दोन वर्षात कमी करण्यात पालिकेला यश आले आहे. जुन्या जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्याचे, मोठ्या जलवाहिन्यांऐवजी जलबोगदे तयार करण्याचे काम पालिकेने हाती घेतले असून त्यामुळे पाणी गळती व चोरीचे प्रमाण कमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

१८ टक्के पाणी गळतीमधून वाया

जमिनीच्या वर असलेले जलबोगदे, जलवाहिन्या यात पाणी गळती होत असली की ती दुरुस्त करणे शक्य असते. मात्र जमिनीखालील जलवाहिन्यांमध्ये गळती होत असली की अनेकदा त्याचा शोध लागत नाही. मग एखाद्या वस्तीत पाण्याचा दाब कमी झाला की गळती होत असल्याचे लक्षात येते. अशा गळती शोधण्यासाठी विभागांमध्ये पथके नेमण्यात आली आहेत. याद्वारे गळती शोधून दुरुस्ती केली जाते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जमिनीच्या खाली खूप खोलवर असून त्या जीर्ण झाल्या आहेत. या जलवाहिन्यांमध्ये गळती झाली की अनेकदा त्याचा शोध लागत नाही. त्यामुळे पाणी वाया जाते. सुमारे १७ ते १८ टक्के म्हणजेच ८०० दशलक्ष लिटर पाणी हे गळतीमुळे वाया जाते, अशी कबुली पालिका अधिकाऱ्यांनी दिली.