मुंबई : म्हाडाचे कोकण मंडळ ४,०१७ घरांसाठी गणेशोत्सवात सोडत काढणार आहे. या घरांसाठीची अर्जविक्री आणि स्वीकृतीस ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. कोकण मंडळातील विरार-बोळींज, डोंबिवली, बाळकूम, खोणी, शिरढोण, गोठेघर येथील ४०१७ घरांच्या सोडतीसाठी येत्या आठ दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, असे मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर १ ऑगस्टपासून अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात करण्यात येईल. मे मध्ये काढलेल्या घरांच्या सोडतीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ४,६५४ घरांपैकी केवळ २,२१९ घरांसाठीच सोडत काढावी लागली. विकल्या न गेलेल्या घरांची संख्या मोठी असल्याची चिंता मंडळाला सतावत असताना  ६०० हून अधिक सोडतविजेत्यांनी घरे परत केली. त्यामुळे जेमतेम १५०० घरेच विकली गेल्याने मंडळाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले.

या पार्श्वभूमीवर शिल्लक घरांसाठी जुलैमध्ये पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल असे मंडळाने जाहीर केले होते. त्यानुसार आता तयारी सुरू करण्यात आली आहे. या आधी तीन हजार घरांसाठी सोडत काढण्यात येणार होती, पण आता ही संख्या चार हजाराहून अधिक झाली आहे. मेमधील सोडतीच्या शिल्लक घरांमुळे ही संख्या वाढली आहे. तर बोळींजसाठीच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजनेतील शिल्लक घरांमध्ये आणखी काही घरांची भर पडली आहे. त्याशिवाय, मंडळाला २० टक्के योजनेतील बाळकूम येथील काही घरेही मिळाली आहेत.

किंमत किती?

या सोडतीतील घरांच्या किंमती २० लाख ते ४० लाख दरम्यान असू शकतात. मुंबईच्या सोडतीसाठी मोठी स्पर्धा असल्याने अयशस्वी अर्जदारांना कोकण मंडळातील घरांसाठी अर्ज करण्याची संधी देण्यात येणार आहे.

योजनानिहाय घरांची संख्या

  • पंतप्रधान आवास योजना – ६५६
  • २० टक्के योजना – १०८२ 
  • कोकण मंडळ प्रथम प्राधान्य -२२११
  • पत्रकार (डिजिटल)-६७