मुंबई : पोलिसांनी वेश्याव्यवसायातून कारवाई केलेल्या १४ पैकी ७ महिलांना एचआयव्हीची लागण झाल्याची बाब वैद्यकीय तपासणीतून समोर आली आहे. या महिलांना चांगल्या पगाराचे आमिष दाखवून भारतात आणण्यात आले होते. त्यांना मुंबईसह वेगवेगळ्या शहरात पाठवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता.
परिमंडळ ११ च्या पोलीस पथकाने मागील आठवड्यात छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला होता. बांगला देशातून गरजू महिलांना भारतात नोकरीच्या आमिषाने आणले जात होते. वेगवेगळ्या दलालांमार्फत त्यांना मुंबईतील कुंटणखान्यात, विविध लॉजमध्ये पाठवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात येत होते. या महिलाना मासिक ४० ते ५० हजार रुपये पगार दिला जात होता. पोलिसांच्या विशेष पथकाने मालवणी, तसेच अन्य परिसरात कारवाई करून १४ महिलांची सुटका केली होती. या सर्व महिला बांगला देशी नागरिक होत्या. त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता १४ पैकी ७ जणींना एचआयव्हीची लागण झाल्याचे आढळून आले. सध्या या महिलांची रवानगी शासकीय सुधारगृहात करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना बांगला देशात पाठवण्यात येणार आहे.
पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार फारूख नावाचा बांगला देशी नागरिक आहे. त्याने पश्चिम बंगाल येथे आपली आपले दलाल तयार केले होते. फारूख बांगला देशातील १९ ते ३० वर्ष वयोगटातील गरजू तरूणींना भारतातील नोकरीचे आमिष दाखवत होता. त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात ४० ते ५० हजार रुपयांची नोकरी मिळेल, असे आश्वासन देऊन त्यांना भारतात आणण्यात येत होते. त्यानंतर या महिलांना तो दलालांकडे पाठवायचा. फारूख दलालांकडून एका महिलेमागे २० हजार रुपये घेत होता. जहांगिर नावाचा दलाल या महिलांना पश्चिम बंगाल येथे ठेवायचा. तेथून शाहीन मालदार आणि मोहम्मद रझाक हे मुंबईतील वेगवेगळ्या दलालांकडे या महिलांची रवानगी करायचे. मुंबईतील भाड्याने घेतलेल्या घरात या तरुणींना ठेवून त्यांच्याकडून मासिक वेतनावर वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता.