शक्ती मिल परिसरातील दोन्ही सामूहिक बलात्कार खटल्यांमधील तीन सामायिक आरोपींना दोषी ठरविल्यानंतर ‘गुन्हेगारी मनोवृत्तीचे’ म्हणून त्यांच्या शिक्षेत वाढ करून फाशीची शिक्षा देण्याबाबतचा नवा आरोप सत्र न्यायालयाने त्यांच्यावर सोमवारी निश्चित केला. परंतु या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान द्यायचे आहे, असे सांगत आरोपींच्या वकिलांचे मंगळवारी सकाळपासूनच विलंबनाटय़ सुरू झाले. मात्र दिवस संपेपर्यंत उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेच नाही. तरीही हा जीवनमरणाचा प्रश्न असल्याचे सांगत आरोपींच्या वकिलांनी आणखी एक दिवस मागितला. न्यायालयाने ही विनंती मान्य केली खरी; परंतु विलंबनाटय़ाची गंभीर दखलही घेतली. बुधवारी दुपापर्यंत उच्च न्यायालयात अपील केले नाही तर सरकारी पक्षाने हजर केलेल्या साक्षीदारांची उलटतपासणी घ्या, असे न्यायालयाने त्यांना बजावले.
आरोपींवर नव्याने ठेवण्यात आलेला आरोप सिद्ध करण्यासाठी सरकारी पक्षातर्फे मंगळवारी सकाळी दोन साक्षीदार हजर करण्यात आले. टेलिफोन ऑपरेटर सामूहिक बलात्कार खटल्याचे तपास अधिकारी निकुंभे आणि आरोपी कासीम बंगाली हा अल्पवयीन असताना दोन वेळा चोरीच्या गुन्ह्य़ांमध्ये व्यक्तिगत मुचलक्यावर बाहेर आल्याचे सांगणारे निवृत्त हवालदार निंबा जाधव यांची साक्ष या वेळी नोंदविण्यात आली. मात्र नव्याने आरोप ठेवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सांगत आरोपींच्या वकिलांनी त्यांची उलटतपासणी घेण्यास नकार दिला.
उच्च न्यायालयात जाण्यास वेळ द्यावा आणि तोपर्यंत सुनावणी घेऊ नये, अशी विनंती न्यायालयाला केली. न्यायालयाने त्यांना सायंकाळी चापर्यंतची वेळ दिली होती; परंतु चार वाजता सुनावणी सुरू झाल्यानंतर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपींच्या वकिलांनी उच्च न्यायालयात निर्णयाला आव्हान देणारे अपील केलेलेच नाही आणि न्यायालयाची दिशाभूल करून सुनावणीला विलंब करण्याची ही आरोपींच्या वकिलांची खेळी असल्याचा आरोप केला. त्यावर सुरुवातीला या आरोपांचे खंडन करणाऱ्या आरोपींच्या वकिलांनी न्यायालयाने विचारणा केल्यानंतर मात्र आपण अद्याप अपील केलेले नसल्याचे मान्य केले.