तुरुंगाचे गज कापून कैदी पळून जातात, त्यांच्याकडे मोबाइल सापडतात, शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची आणखी बरीच सरबराई होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्याची गंभीर दखल घेत, राज्यातील सर्वच तुरुंगातील गैरकारभाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अप्पर महासंचालकांमार्फत चौकशी केली जाईल व त्यात दोषी आढळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुण्यातील येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याकडे मोबाइल सापडला व त्याचा इतर कैदीही वापर करीत आहेत, त्यावर शासनाने काय कारवाई केली असा प्रश्न अनंत गाडगीळ व अन्य सदस्यांनी विचारला होता. कैद्यांना मोबाईलच काय, गाद्याही पुरवल्या जातात, या साऱ्या गलथान कारभारकडे दूर्लक्ष केले जात आहे का, अशी विचारणा डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. एसीबीच्या अप्पर महासंचालकांमार्फत राज्यातील सर्वच तुरुंगांतील गैरकारभाराची चौकशी केली जाईल, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केवळ निलंबित करणार नाही, तर सेवेतून बडतर्फ केले जाईल, असे त्यांनी जाहीर केले.