मुंबई: मुंबईत आधीच महिन्याभरासाठी पाच टक्के पाणी कपात लागू असताना मंगळवारी एक दिवसासाठी १५ टक्के पाणी कपात करण्याची वेळ मुंबई महानगरपालिकेवर आली आहे. पिसे येथील जलाशयात बिघाड झाल्यामुळे दुरुस्ती कारणास्तव ही पाणी कपात लागू करण्यात येणार आहे.

पिसे येथील बांधावरील गेटच्या ३२ पैकी एका रबरी ब्लाडरमध्ये शनिवारी अचानक बिघाड झाल्याने पाणी गळती सुरू झाली. त्याची दुरुस्ती करण्यासाठी पिसे येथील पाण्याची पातळी ३१ मीटर पर्यंत खाली आणण्यासाठी भातसा धरणातून येणारा पुरवठा नियंत्रित करावा लागला. तदनंतर बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने रबरी ब्लाडर दुरूस्तीचे काम सोमवारी युद्धपातळीवर पूर्ण केले. भातसा धरणातून पुनश्च पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, बंधा-याची पाणी पातळी पूर्ववत होण्याकरिता कालावधी लागणार असल्याने मंगळवारी १९ मार्च रोजी एक दिवसासाठी संपूर्ण मुंबई महानगराच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के पाणीकपात केली जाणार आहे.

हेही वाचा >>>बेस्ट उपक्रमाच्या १७० बसगाड्यांवर हवशुद्धीकरण यंत्रे कार्यान्वित

भातसा धरणातून सोडण्यात आलेले पाणी पिसे येथे बंधारा बांधून तयार केलेल्या जलाशयामध्ये साठविले जाते. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये प्रक्रिया करून येवई येथील महासंतुलन जलाशया मार्फत मुंबईकरांना हा पाणीपुरवठा केला जातो. पिसे बंधा-याच्या गेटमधील रबरी ब्लाडर मध्ये अचानक बिघाड झाला. त्यातून पाणी गळती झाली. बंधाऱ्यातील पाणीपातळी ३१ मीटर पर्यंत आल्यानंतर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. सोमवार, दिनांक १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत यांत्रिक झडपा दुरूस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भातसा धरणातून पिसे बंधा-यासाठी पाणी सोडण्यात आले आहे. तथापि, धरण ते बंधारा यातील अंतर सुमारे ४८ किलोमीटर आहे. त्यामुळे पिसे बंधा-यातील पाणी पातळी वाढण्यास कालावधी लागणार आहे. बंधा-याची पाणीपातळी पूर्ववत होईपर्यंत म्हणजेच मंगळवार, दिनांक १९ मार्च २०२४ रोजीच्या म्हणजे एक दिवस पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.