हिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवून आणि ती जिंकून येऊन दाखवावी असं आव्हान नवनीत राणा यांनी दिलं आहे. लीलावती रूग्णालयातून रविवारी नवनीत राणा यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं आहे. यानंतर आता शिवसेनेकडूनही प्रतिक्रिया देण्यात येत आहे. सोमवारी नानावटी रुग्णालयाच्या विस्तारणाच्या भूमीपूजनासाठी मंत्री आदित्य ठाकरे आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी याबाबत भाष्य केले आहे.

रविवारी हॉस्पिटलमधून बाहेर पडताना नवनीत राणा यांना हा धार्मिक लढा होता आणि तो पुढेही चालू ठेवणार आहे असे म्हटले होते. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या विरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हानही दिले आहे. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांनी छातीत दुखणे आणि उच्च रक्तदाबाची तक्रार केली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

“आम्ही अशा फालतू विषयावर बोलत नाही. आपण चांगली कामे पाहत आहात. मागच्या आठवड्यात कुपर रुग्णालयात आपण उद्घाटन केले आहे. जनसेवेची जी कामे आहेत त्यावर आम्ही बोलू,” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना निवडणूक लढण्याचे आव्हान

मुख्यमंत्र्यांना निवडणूक लढण्याचे आव्हान नवनीत राणा यांनी रुग्णालयातून बाहेर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये दम असेल, तर माझ्याविरुद्ध कोणत्याही जिल्ह्यातून लढून दाखवा. मी तुमच्याविरोधात निवडणूक लढणारच आहे. नारीशक्ती काय असते हे तुम्हाला दाखवून देऊ. तुम्हाला पराभूत केल्याशिवाय राहणार नाही,” असं नवनीत राणा म्हणाल्या.

दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली. राज्यकारभार कसा करायचा हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिकावं, असं सल्ला राणांनी मुख्यमंत्री ठाकरेंना दिला आहे.दिल्लीला रवाना होण्यापूर्वी नवनीत राणांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “डॉक्टरांना विनंती करून मी डिस्चार्ज घेतला आहे. माझे अजूनही प्रकृतीबद्दल समस्या आहेत. जे माझ्यासोबत घडलं, त्यावर कुणी कारवाई केली नाही.”

“आमच्यासोबत जे काही घडलं. आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला. विशेषतः उद्धव ठाकरेंनी केलं. त्यांच्याविरुद्ध मी दिल्लीत जाऊन तक्रार करणार आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेणार आहे. पोलीस कोठडीपासून ते तुरुंगापर्यंत जे काही माझ्यासोबत घडलं. त्यांनी जे काही केलं, तुरुंगात गेल्यावर आपण लोकप्रतिनिधी नसतो. कैद्यासारखी वागणून दिली जाते. पण त्यालाही काही नियम असतात,” असं राणा माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.