मुंबई : कृषी सहाय्यकांच्या अडचणी पंधरा दिवसांत सोडविण्याचे आश्वासन कृषिमंत्र्यांनी पाळले नाही. त्यामुळे राज्यभरातील कृषी सहाय्यकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. पाच मेपासून काळ्या फिती लावून आंदोलनाला सुरू होईल. पंधरा मेपर्यंत मागण्यांची सोडवणूक न झाल्यास पंधरा मे पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा कृषी सहाय्यकांनी दिला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी या पूर्वी आंदोलन पुकारले होते. त्या पार्श्वभूमीवर दहा फेब्रुवारी २०२५ रोजी बैठक घेऊन पंधरा दिवसांत मागण्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. पण, आजपर्यंत मागण्यांची सोडवणूक झाली नाही. त्यामुळे कृषी सहाय्यकांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.
कृषी सहाय्यकांच्या प्रमुख मागण्या
कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती द्यावी. कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करा. सर्व कामकाज डिजिटल स्वरुपात होत आहे, त्यामुळे लॅपटॉप द्यावा. कृषी सहाय्यकांना ग्रामस्तरावर कामकाजासाठी कृषी मदतनीस द्यावा. निविष्ठा वाटप करण्यासाठी भाड्याची तरतुद करा. कृषी विभागाच्या आकृतीबंधास तत्काळ मंजुरी द्या. कृषी पर्यवेक्षकांची पदे वाढवून कृषी सहाय्यकांना पदोन्नती द्या. पोकरा योजनेमध्ये समूह सहाय्यकांची पदे पूर्वीप्रमाणे भरा. नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे करताना कृषी, महसूल आणि ग्रामविकास विभागांना योग्य पद्धतीने जबाबदारीचे वाटप करा. सिल्लोडमधील कृषी सहाय्यकांच्या आत्महत्येची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा.
पाच मे पासून आंदोलन
पाच : कृषी सहाय्यक काळ्या फिती लावून काम करतील.
सहा : कृषी सहाय्यक सर्व सरकारी व्हाटस् अॅप समूहातून बाहेर पडतील.
सात : तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहाय्यकांचे धरणे आंदोलन.
आठ : कृषी सहाय्यक एका दिवसाच्या सामूहिक रजेवर जातील.
नऊ : कृषी सहाय्यक सर्व ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकतील.
पंधरा : पंधरा मेपर्यंत कृषी सहाय्यकांच्या मागण्या पूर्ण न केल्यास पंधरा मेपासून बेमुदत कामबंद आंदोलन.