Ajit Pawar On Mumbra Train Accident : मुंबईजवळ दिवा-मुंब्रा रेल्वेस्थानकांच्या दरम्यान झालेल्या रेल्वे अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली आहे. यानंतर राजकीय वर्तुळातून यावर टीका टिप्पणी केली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या रेल्वे अपघाताबद्दल प्रतिक्रिया देताना मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत. तसेच या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.
अजित पवार म्हणाले की, “या दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे विभागाची आहे हे कोणी नाकारू शकत नाही. परंतू त्यांची जबाबदारी आहे पण याबाबतचे चौकशीचे आदेश नक्कीच निघाले असतील. चौकशी केल्यानंतर वस्तुस्थिती काय आहे हे सगळ्यांच्या समोर येईल. राजकीय व्यक्ती आणि नेत्यांनी काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे असे अजित पवार यावेळी म्हणाले.” मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर उत्तर देताना अजित पवारांनी हे मत व्यक्त केले आहे.
अजित पवार काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी या दुर्घटनेबद्दल माहिती दिली आहे. “….रेल्वेला मेट्रो सारखे दरवाजे नसल्याने बरेचसे प्रवाशी दरवाज्यात लटकले आणि ते घासले गेले, त्यामुळे आठ प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या घटनेत सुरूवातीचा आकडा आला तेव्हा सहा प्रवाशांचा दुर्दैवाने मृत्यू झाला, तरा दोन प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. अपघात झाला तेव्हा सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी खाली पडल्याचे सांगितले जात होते, पण अर्थाअर्थी पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याची माहिती मध्य रेल्वेचे माहिती अधिकाऱ्यांनी दिली,” असे अजित पवार म्हणाले.
लोकलमध्ये प्रवासी फुट ओव्हरवरून प्रवास करत होते. दोन लोकल गाड्यांमध्ये दरवाजावरील प्रवाशांची बॅग एकमेकांना घसली आणि ही घटना घडली असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच अजून चार जखमींवर उपचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री हे रेल्वेमंत्र्यांशी शंभर टक्के बोलले असतील. मी देखील अश्विनी वैष्णव यांच्याशी संपर्क साधणार आहे. नेमकं काय उपाययोजना केल्यानंतर मुंबईकरांचा किंवा लोकलमधून प्रवास करणाऱ्यांचा जीव सुरक्षित राहील यासाठी पावले उचलली जातील, असे अजित पवार म्हणाले.
“झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, मनाला वेदना देणारी आहे. ज्यांचे दुखःद निधन झालं त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. अशा घटाना घडल्यानंतर रेल्वे मंत्रालया मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर करतं. जखमी असतात त्यांचा संपूर्ण खर्च विभागाकडून केला जातो, ती अडचण येणार नाही,” असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
नेमकं काय झालं?
कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (सीएसएमटी) जणाऱ्या लोकल रेल्वेमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. सकाळी ९.२० च्या दरम्यान, दिवा व मुंब्रा स्थानकांच्या दरम्यान ही घटना घडली आहे. लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे काही प्रवासी डब्याच्या दरवाज्यात (फूटबोर्ड) लटकत उभे होते. त्याचवेळी बाजूने जाणारी लोकल या प्रवाशांना घासून गेली. या लोकलच्या धक्क्याने आठ प्रवासी दरवाजातून खाली पडले. यापैकी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.