राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिंदे गटाच्या ४० आमदारांना मिळणाऱ्या निधीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. “४० आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण सुरू आहे”, असा आरोप अजित पवारांनी केला. तसेच यामुळे भाजपाचे १०५ आमदारही नाराज असल्याचा दावा केला. ते सोमवारी (१३ मार्च) अधिवेशनात बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “४० आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण सुरू आहे. २८८ आमदारांपैकी केवळ ४० आमदारांचंच सरकार आहे की काय अशाप्रकारची शंका येते. यामुळे भाजपाचेही १०५ आमदार नाराज झाले आहेत. ते बोलत नाहीत, मात्र मागून खूप धुसफूस सुरू आहे. त्यांना फार त्रास होत आहे.”

“भाजपाच्या नाराज आमदारांना काही बोलूच दिलं जात नाही”

“हे त्यांना सांगतात की, थांबा, दम काढा, विरोधी पक्षात बसण्यापेक्षा त्यांच्या नेतृत्वात आपलं काहीतरी बरं चाललं आहे. असं असलं तरी चांगलं चालावं म्हणून त्यांना २०२४ पर्यंत थांबा म्हणून सांगत आहेत. मार्गदर्शन तर असं सुरू आहे की, या नाराज आमदारांना काही बोलूच दिलं जात नाही. असं बरोबर नाही. मूळ अर्थसंकल्पाची सरकार अंमलबजावणी करत नाही. आपल्या आमदारांना सांभाळण्यासाठी निधीची उधळण होते,” असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

अजित पवारांनी ४० आमदारांसाठी निधीची उधळण केल्याचा आरोप करत आकडेवारीच वाचली

अजित पवारांनी ४० आमदारांसाठी निधीची उधळण केल्याचा आरोप करत आकडेवारीच वाचली. ते पुढे म्हणाले, “तुम्ही म्हणाल निधीची उधळण कशी होते. मी १ डिसेंबर २०२२ चा एक जीआर बघितला. नगरविकास विभागाने जीआर काढला की, ठाणे महानगरपालिका क्षेत्रासाठी १९५ कोटी रुपयांची मंजुरी दिली. मीरा-भाईंदर २५५ कोटी रुपयांची मंजुरी दिली.”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : “हा कुणीतरी केलेला चावटपणा आहे”, पहाटेच्या ‘त्या’ घटनेचा उल्लेख करत अजित पवारांचं वक्तव्य

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ठाण्यासाठीच्या या निधीपैकी संगीत कारंजे आणि सुशोभीकरण याला ५० कोटी, स्मशानभूमीत विद्युतदाहिनी आणि सुशोभीकरणाला ५० कोटी, विहिरींची साफसफाई ५० कोटी, डोंगराळ भागात सोलर दिवे बसवणे ५० कोटी रुपये, बस स्टॉप आणि ज्येष्ठ नागरिकांना कट्टा ५० कोटी, विद्यार्थ्यांसाठी उद्यानात अभ्यासिका २५ कोटी रुपये, चौकांचं सुशोभीकरण २० कोटी, सिग्नल यंत्रणा १० कोटी फुटपाथवर शोभिवंत रेलिंगसाठी २५ कोटी रुपये खर्च करण्यात आले,” असं अजित पवारांनी सांगितलं.