मुंबई : मुंबई – नागपूर दरम्यानच्या ७०१ किमी लांबीच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा’च्या (एसटी) बसगाड्यांना वाहतुकीस परवानगी द्यावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केली आहे. याबाबत शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले आहे.
समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे गुरुवारी उद्घाटन झाले. आता ७०१ किमी लांबीचा ‘समृद्धी’ महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील १० जिल्हे, २६ तालुके, ३९ शहरे आणि ३९२ गावांना जोडणारा हा मार्ग राज्याच्या अर्थव्यस्थेचा महामार्ग होणार आहे. मात्र, या महामार्गावरून ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा’च्या बसगाड्यांना धावण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. समृद्धी महामार्ग सार्वजनिक निधीतून बनलेला आहे. तो सामान्य नागरिकांना वापरता आला पाहिजे, असे मत शेख यांनी व्यक्त केले.
हेही वाचा
‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ’ सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे. या बसगाड्यांना ‘समृद्धी’वर धावण्याची परवानगी दिली जात नाही, तोपर्यंत हा मार्ग श्रीमंतांची चैन असणार आहे, असेही शेख यांनी नमूद केले. तसेच, सार्वजनिक व्यवस्था नेहमी तोट्यात असतात. ‘समृद्धी’ महामार्गावर २६ टोलनाके असल्यामुळे ‘राज्य परिवहन महामंडळा’च्या बसेसना ‘समृद्धी’वर धावण्यास परवानगी देताना टोलमाफी देण्यात यावी, अशीही मागणी शेख यांनी केली. टोलमाफी न केल्यास सामान्यांना हा प्रवास परवडणारा नाही, असे त्यांनी सांगितले.