मुंबई : अमरावती तालुक्यात बोगस शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीबाबत तक्रारी प्राप्त असून याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली.
अमरावतीचे तत्कालीन शिक्षण उपसंचालक शिवलिंग पटवे यांच्या कार्यकाळात शेकडो शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस भरती झाली. यात माजी शिक्षण राज्यमंत्र्याचा नातेवाईकही सहभागी आहे, असा आरोप प्रवीण तायडे यांनी केला. महिनाभराच्या आत या शिक्षक-शिक्षकेतर भरतीची चौकशी केली जाईल. राज्यव्यापी शालार्थ घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी पथक स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आला आहे.
सनदी अधिकारी, भारतीय सेवेतील पोलीस अधिकारी आणि शिक्षण विभागाचा एक वरिष्ठ अधिकारी अशी ‘एसआयटी’ लवकरच स्थापन केली जाईल आणि हा तपासही त्यामार्फत केला जाईल, असे मंत्री भुसे म्हणाले.