मुंबई : अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेनिमित्त व्यासपीठावर फक्त इंग्रजी आणि हिंदी या दोनच भाषांमध्ये फलक लावण्यात आल्याने मराठीची अवहेलना झाल्याचा आरोप विरोधकांनी केला.
व्यासपीठाच्या मागील बाजूस लावण्यात आलेल्या फलकावर हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषांचा वापर करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या राजधानीत ही परिषद होत असताना मराठी भाषा का नाही? असा सवाल विरोधकांनी सरकारला केला. दरम्यान, ‘अंदाज समितीचा कार्यक्रम लोकसभा सचिवालयाने आयोजित केलेला होता. आपल्या विधानसभेचा किंवा आपला कार्यक्रम जिथे कुठे असतो तिथे सर्वात आधी मराठी असते आणि मराठीच राहणार,’ असे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी मनसेचे संदीप देशपांडे यांनी केलेल्या विधानावरून वाद निर्माण झाला. त्यांच्या वादग्रस्त विधानावरून हक्कभंग आणण्याचा इशारा महायुतीच्या नेत्यांनी दिला आहे.