भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांचे कथिक आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. यावरून विरोधकांनी किरीट सोमय्यांसह भाजपावर शाब्दिक हल्ला चढवला. आता याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. शिवसेनेचे (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी या मुद्द्यावरून सरकारवर हल्ला चढवला.

अनिल परब म्हणाले, “विधानसभेत गेल्या काही वर्षा बरेच पेनड्राईव्ह बॉम्ब फुटले. आज हा पेनड्राईव्ह बॉम्ब विधानपरिषदेत आला आहे. एका वृत्तवाहिनीवर भाजपाच्या एका माजी खासदाराचा एक व्हिडीओ प्रसारित झाला आणि तो व्हायरल झाला आहे. यात कुणाचीही बदनामी होता कामा नये. अंबादास दानवेंनी सांगितलं की, कुणाच्याही राजकीय जीवनातील बदनामीमुळे राजकीय आयुष्य उद्ध्वस्त झालं, तर तो राजकारणाचा भाग आहे. परंतु एखाद्याचं खासगी आयुष्य उद्ध्वस्त होतं, एखाद्याच्या कुटुंबावर प्रसंग येतो हा अनुभव आम्ही घेतला आहे.”

“चंद्रकांत पाटलांनाही मुलंबाळं आहेत, या मुलांना…”

“चंद्रकांत पाटलांसह ‘पार्टी विथ डिफरन्स’ बोलणाऱ्या पक्षातील नेत्यांनाही मुलंबाळं आहेत. या मुलांना यंत्रणेसमोर उभं केलं जातं तेव्हा यंत्रणेचे लोक वेगवेगळे घाणेरडे प्रश्न विचारतात. छगन भुजबळांनी अडीच वर्षे तुरुंगात घालवली आहेत. न्यायालयाने त्यांना निर्दोष सोडलं. मात्र, त्या अडीच वर्षांची भरपाई कोण करणार? म्हणून या व्हायरल व्हिडीओच्या विषयावर चर्चा होणं गरजेचं आहे,” असं मत अनिल परब यांनी व्यक्त केलं.

“त्या बदनामीची उत्तरं इथंच दिली पाहिजेत”

अनिल परब म्हणाले, “हा प्रश्न किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील किंवा मी असा नाही. हा प्रश्न राजकीय जीवनात काम करणाऱ्या एका माणसाचा आहे. राजकीय व्यक्ती आपलं राजकीय आयुष्य पणाला लावून इथपर्यंत आलेला असतो. या व्यक्तींनी पोलिसांचा मार खाल्ला आहे, प्रचंड मेहनत केलेली असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आंदोलनातून आले आहेत. जेव्हा अशा करियरवर आघात होतो, बदनामी केली जाते तेव्हा त्या बदनामीची उत्तरं इथंच दिली पाहिजेत. म्हणून हे सभागृह आहे. हे सभागृह न्याय मिळावा, कुणाची राजकीय आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठीच आहे.”

“या व्हिडीओतील ती महिला कोण आहे हे कळलंच पाहिजे”

“काल ज्या माजी खासदाराचा व्हिडीओ व्हायरल झाला त्याने अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली आहेत. म्हणून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं, अशी आमची इच्छा नाही. मात्र, या व्हिडीओची सत्यता बाहेर आलीच पाहिजे. या व्हिडीओतील ती महिला कोण आहे हे कळलंच पाहिजे. त्या महिलेने का आरोप केले आहेत. आम्हाला जी माहिती मिळाली ती खरी खोटी ती तपासून पहावी,” अशी मागणी अनिल परब यांनी केली.

हेही वाचा : “किरीट सोमय्या नग्न झाले, पेन ड्राईव्ह घेऊन सभागृहात…”, अंबादास दानवेंचा हल्लाबोल

“फडणवीस प्रत्येक गोष्टीत एसआयटी लावतात, आता…”

परब म्हणाले, “गृहमंत्री फडणवीस प्रत्येक गोष्टीत एसआयटी लावतात. आता माझं म्हणणं आहे की, एसआयटीच काय आमच्यामागे अगदी भारतीय गुप्तहेर संघटना रॉ लावा. कारण आमच्यामागे इतर कोणतीच संघटना लावणं राहिलेलं नाही. फडणवीसांची राज्यात अशा गोष्टी खपवून घेणार नाही, असं आपल्या भाषणात हजारदा म्हटल्याचं आम्ही ऐकलं आहे. त्यांची तशी एक प्रतिमा आहे. अशा उपमुख्यमंत्र्यांना आज अशा प्रसंगाला सामोरं जावं लागत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तपास यंत्रणांमधील महिला अधिकाऱ्यांना फोन करून हे प्रकार घडले”

“तपास यंत्रणांमधील ज्या महिलांना आपली फाईल बघितली जाईल आणि त्या फाईलवर काही शेरा मारला जाईल, अशी भीती वाटत होती त्यांना फोन करून हे प्रकार घडले आणि हे प्रकार ८ तासांच्या व्हिडीओत आले, असं आम्ही ऐकतो आहे. खरं खोटं आम्हाला माहिती नाही. काही महिला अंबादास दानवेंना भेटल्या असतील, आम्हाला फोनद्वारे काही माहिती मिळाली असेल. आता यातील सत्य शोधणं सरकारचं काम आहे. हे व्हिडीओ पाठवणारी महिला कोण हे महाराष्ट्राला कळलंच पाहिजे,” अशी मागणी अनिल परबांनी केली.