‘बदलता महाराष्ट्र’मध्ये आज-उद्या नवउद्यमींना दिशादर्शन; मुख्यमंत्र्यांचीही उपस्थिती
जीवन अधिकाधिक सुखमय करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत अनिवार्य बनली आहे. मानवी विकासाचा आणि राष्ट्रविकासाचा तंत्रपर्याय नवउद्योजकांच्या कल्पकतेतून साकारला जात आहे. या पाश्र्वभूमीवर, तरुणांमधील सळसळत्या उद्यमशील संस्कृतीला दिशा देण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत ‘पर्व स्टार्टअपचे’ या दोनदिवसीय परिसंवादाचे आज, २९ नोव्हेंबर, व उद्या ३० नोव्हेंबर रोजी आयोजन केले आहे. ‘स्टार्टअप’ प्रवर्तकांच्या अनुभवांची शिदोरी या कार्यक्रमाद्वारे खुली होईल.
हा परिसंवाद ‘एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर लिमिटेड’ यांच्या सहकार्याने होत असून कार्यक्रम पॉवर्डबाय ‘केसरी’ आणि ‘रीजन्सी’ आहे. या कार्यक्रमाला टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी २४ तास’ची साथ लाभली आहे. या परिसंवादात स्टार्टअपच्या प्रारंभाबाबत विविध स्टार्टअपचे संस्थापक संवाद साधतील. तर, स्टार्टअप उभारताना सामोरे येणारे निधीउभारणीचे आव्हान कसे पेलता येऊ शकेल, यावर खासगी तसेच सरकारी गुंतवणूक संस्थांचे प्रतिनिधी प्रकाश टाकणार आहेत.
‘बदलता महाराष्ट्र’मधील या परिसंवादाचे उद्घाटन आज, मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी पेटीएम बँकेचे उपाध्यक्ष अभिषेक अरुण यांच्या भाषणाने होणार आहे. स्टार्टअप उभारताना नेमक्या कोणत्या गोष्टी प्राधान्याने लक्षात घेणे आवश्यक आहे, तसेच नवउद्योगाच्या उभारणीतील आव्हाने कशी पेलता येतील, त्यांवर कशी मात करता येईल, देशात भविष्यात कोणत्या नवउद्योगांची गरज आहे, अशा विविध मुद्दय़ांवर अभिषेक अरुण आपल्या भाषणात उहापोह करतील.
परिसंवादाचा समारोप उद्या, बुधवार, ३० नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने होणार आहे.
या विषयांवर चर्चा होणार..
स्टार्टअप क्षेत्रात अपयशी होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. पण अपयशाने खचून न जाता चुका सुधारून पुन्हा यशाच्या शिखरावर पोहोचलेली मंडळी नवउद्योगातील चुका कशा टाळता येतील याबाबतचे अनुभवाचे बोल सांगतील. तर स्टार्टअप उभारून त्याचे मोठय़ा उद्योगात रूपांतर करण्यात यश मिळवणारे यशस्वी संस्थापक त्यांच्या यशाचे गमक उलगडणार आहेत. याशिवाय स्टार्टअपच्या उभारणीतील सरकारी यंत्रणांची भूमिका, त्यातील उणीवा अशा प्रश्नांवरही परिसंवादात विचारमंथन होईल.
आजचे चर्चापर्व
- उद्घाटन – अभिषेक अरुण, उपाध्यक्ष, पेटीएम बँक
- पहिले चर्चासत्र – आमचे स्टार्टअपचे दिवस
- सहभाग – मिहिर करकरे (सहसंस्थापक, सोशल वेव्हलेंग्थ), उत्साह खरे (सहसंस्थापक कारबाझी डॉट कॉम), श्रीकृष्ण भारंबे (सहसंस्थापक, फिंगरलिक्स)
- दुसरे चर्चासत्र – गुंतवणुकीचे आव्हान
- सहभाग – डॉ. रवी त्यागी (प्रमुख, सिडबी व्हेंचर्स), शैलेश घोरपडे (व्यवस्थापकीय भागीदार आणि मुख्य माहिती अधिकारी, एक्स्फिनिटी व्हेंचर्स), सतीश कटारिया (व्यवस्थापकीय संचालक, कॅटापूल्ट)
- तिसरे चर्चासत्र – अपयशातून यशाकडे
- सहभाग – आशीष शाह (संस्थापक, व्हटरेझ), शैलेश संसारे (व्यवसाय सल्लागार), किरण पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रोविस्टो)