मुंबई : दिवाळीच्या तोंडावर बेस्ट उपक्रम आणि अदानी विद्युत कंपनीच्या कामगारांनी बोनसच्या मागणीसाठी संपाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरात ऐन दिवाळीत वीज जाण्याची शक्यता आहे. बेस्ट उपक्रमाबरोबरच अदानी विद्युत कंपनीतील कामगारांनाही बोनसच्या मागणीसाठी आंदोलन करावे लागत आहे.
दिवाळी अगदी तोंडावर आल्यामुळे सरकारी व खासगी कार्यालयांमध्येही बोनसची मागणी जोर धरू लागली आहे. मुंबईत वीज वितरण क्षेत्रात शहर भागात बेस्ट उपक्रमाचे जाळे आहे तर उपनगरात अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचे वीज वितरण आहे. या दोन्ही कंपनीच्या कामगारांनी बोनससाठी आंदोलनाची तयारी केली आहे. मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियन ही संघटना दोन्ही कंपन्यांमध्ये असून या संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
बेस्ट उपक्रमात ८.३३ टक्के आणि अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना २० टक्के दिवाळी बोनस द्या अन्यथा ऐन दिवाळीत आंदोलन अटळ आहे, असा इशारा मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी दिला आहे. या वाढीव बोनसच्या मागणीवर बेस्ट, अदानी कंपनीतील कर्मचारी ठाम असून कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर चर्चा करण्यासाठी युनियनच्या व्यवस्थापकीय सभासदांची बुधवारी संध्याकाळी उशारापर्यंत बैठक सुरू होती.
कामगार भरती न केल्यामुळे पैशांची बचत झाली …
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन, अभियांत्रिकी, सामान्य प्रशासकीय विभाग व वीज पुरवठा विभागातील स्थायी कामगारांची १५ हजार रिक्त पदे आहेत. ही पदे गेल्या काही वर्षात भरलेली नाहीत तर दुसरीकडे रिक्त पदांवर कामगारांना पद्दोन्नती देण्यात आलेली नाही. तसेच कायम पदावर असलेल्या हंगामी कामगारांना कायम करण्यात आलेले नाही. या माध्यमातून बेस्ट उपक्रमाने कोट्यवधी रुपये वाचवले आहेत. त्यामुळे कामगारांना वाढीव बोनस मिळाला पाहिजे अशी मागणी विठ्ठलराव गायकवाड यांनी केली.
बेस्ट उपक्रमात कामगार कर्मचाऱ्यांचा वेतन करार हा १ एप्रिल १९१६ पासून प्रलंबित आहे. याशिवाय बेस्ट उपक्रमातील कामगार कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के दराने दिवाळी बोनस देण्यात यावा,असे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले आहेत. कोर्टाच्या आदेशानुसार बोनस वाटप केले नाही तर बेस्ट उपक्रमातील कामगार कर्मचाऱ्यांचे ऐन दिवाळीत आंदोलन अटळ आहे, असा इशारा विठ्ठलराव गायकवाड यांनी दिला आहे.
अदानी कंपनीने २० टक्के बोनस द्यावाच
अदानीच्या आस्थापना विभागातील स्थायी कामगारांची तीन हजार पदे रिक्त आहेत. कामगारांना पदोन्नती देण्यात आलेली नाही. तसेच कंत्राटी कामगारांना टप्प्या टप्प्याने कायम पदावर सामावून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे अदानी कंपनीनेही कोट्यवधी रुपये वाचवले आहेत. या कंपनीचे वेतनवाढीचे दोन करार न्यायालयात प्रलंबित आहेत. तसेच अदानी कंपनीस प्रत्येक वर्षी सरासरी दोन हजार कोटी रुपयांचा फायदा होत आहे. त्यामुळे स्थायी व कंत्राटी कामगारांना २० टक्के दिवाळी बोनस देण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. या मागणीवर कंपनीने कामगार संघटनेला काहीही प्रतिसाद न दिल्यामुळे अदानी इलेक्ट्रीसिटी मुंबई कंपनीतील कामगारही आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.