मुंबई: साम्यवादाचे क्रांतिकारी प्रणेते कार्ल मार्क्स यांच्या २०७ व्या जयंतीनिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या धारावी शाखेतर्फे सोमवार, ५ मे २०२५ रोजी धारावीमध्ये महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. कामगार, शेतकरी, कष्टकरी, बहुजन, वंचित जनतेच्या मुक्तीचे तत्वज्ञान जगाला देणाऱ्या कार्ल मार्क्सचा जन्मदिवस साजरा करण्याकरिता सर्वांनी सोमवार, ५ मे रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत धारावीतील पीएमजीपी वसाहतीतील इमारत क्रमांक १ व २ च्या मोकळ्या जागेत उपस्थित राहून महाभंडाऱ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनच शेतकरी कामगार पक्षाच्या धारावी शाखेने केले आहे. सण – उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रमांच्या निमित्ताने महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. मात्र एका विचारवंताच्या जयंतीनिमित्त महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
कार्ल मार्क्स हे नाव जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि सर्व वयोगटातील लोकांना एकत्र आणण्यासाठी कार्ल मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी कामगार पक्षातर्फे सर्वात पहिल्यांदा ५ मे २०२३ रोजी धारावीतच महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुकीसाठीच्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम २०२४ साली होऊ शकला नाही. आता पुन्हा दुसऱ्यांदा कार्ल मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, ५ मे २०२५ रोजी धारावीमध्ये महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जर्मनीत जन्मलेल्या कार्ल मार्क्स यांनी समाज, अर्थशास्त्र आणि राजकारणाबद्दल मांडलेले सिद्धांत ‘मार्क्सवाद’ म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांच्या विचारसरणीनुसार चालणारे पक्षही अस्तित्वात आहेत. कार्ल मार्क्स यांची जयंती वेगवेगळ्या डाव्या पक्षांतर्फे साजरी करण्यात येते.
‘जर्मनीमध्ये जन्मलेले कार्ल मार्क्स हे जागतिक कीर्तीचे तत्वज्ञानी होते. त्यांनी कामगारांचे भांडवलदारांकडून होणाऱ्या शोषणावर व पिळवणुकीवर प्रचंड लिखाण केले. तसेच विषमता व दारिद्र्य संपवता येऊ शकते, हे कष्टकरी व गरीब सर्वसामान्य नागरिकांना लिखाणामधून सांगितले. तसेच सर्व कामगारवर्गाला एकत्र येण्याचा सल्ला दिला. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात ८० टक्के नागरिक कामगार वर्गातील आहेत. काळानुरूप कामगारवर्गाचे स्वरूपही बदलले. अनेकदा कामाच्या वाढत्या ताणामुळे काही कामगार आत्महत्येचा पर्याय निवडतात. मात्र जेव्हा ताणतणावाची परिस्थिती निर्माण होते, तेव्हा कार्ल मार्क्स यांचे विचार आणि लिखाण दिशादर्शक ठरते. भारत हा देश सण – उत्सव साजरा करण्यासाठी ओळखला जातो, त्यामुळे भारतीय पद्धतीने कामगार वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांना एकत्र आणून कार्ल मार्क्स यांचे विचार पोहोचवण्यासाठी त्यांच्या जयंतीनिमित्त महाभंडाऱ्याचे आयोजन केले आहे’, असे शेतकरी कामगार पक्ष प्रणित पुरोगामी विद्यार्थी संघटनेची अध्यक्षा ॲड. साम्या कोरडे हिने सांगितले.
शाकाहारी व मांसाहार जेवणाचा बेत, २ हजार नागरिकांची व्यवस्था
शेतकरी कामगार पक्षातर्फे कार्ल मार्क्स यांच्या जयंतीनिमित्त आयोजित महाभंडाऱ्यात शाकाहारी व मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था असणार आहे. धारावीसह मुंबईतील विविध भागांतील नागरिक येण्याची शक्यता लक्षात घेऊन जवळपास २ हजार नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर कार्ल मार्क्स यांचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून विविध गाणी सादर करण्यात येणार आहे.