गोरगरीब धारावीकरांना पक्की घरे मिळू नयेत, यासाठीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी हे धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करीत आहेत. अनेक काँग्रेस सरकारांनी ज्येष्ठ उद्याोगपती गौतम अदानींच्या कंपन्यांना कंत्राटे दिली व करार केले आहेत, असे प्रत्युत्तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिले. काँग्रेसची सत्ता असलेल्या केंद्र आणि राज्य सरकारांकडून अदानींच्या कंपन्यांना विविध प्रकल्पांची कंत्राटे कशी मिळाली, याची यादीच वाचून दाखवीत तावडे यांनी अदानींचा उद्याोग साम्राज्यातील उदय काँग्रेसच्या कृपेनेच झाला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

निविदा उद्धव सरकारच्या काळात

‘राहुल गांधी फेक है’ असा प्रत्युत्तर प्रचार भाजपने सुरू केला असून त्याबाबत तावडे म्हणाले, की धारावीच्या पुनर्विकासाच्या कामाची निविदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी सरकारच्या काळात काढण्यात आली. त्या वेळी अदानींबरोबर अबुधाबीतील शेखशी संबंधित सेकलिंक कंपनीनेही निविदा भरली होती. रेल्वेने जमीन दिल्यानंतर या प्रकल्पाच्या अटींमध्ये बदल झाला व त्यानुसार पुनर्विकासाचे काम सुरू आहे. धारावीत राहात असलेल्या प्रत्येकाला पक्के घर आणि छोट्या व मध्यम उद्याोगांना २२५ चौरस फुटांचे गाळे देऊन योग्य पद्धतीने पुनर्वसन केले जाणार आहे. सेकलिंक कंपनीला कंत्राट मिळाले नाही, म्हणून गांधी विरोध करीत आहेत का, अशी विचारणा तावडे यांनी केली.

हेही वाचा : कोळीवाडीचा मतदानावर बहिष्काराचा निर्णय

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काँग्रेसकडूनही कंत्राटे

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात आपल्याला अनेक प्रकल्पांची कामे मिळाल्याचे अदानींनीच सांगितले आहे. राजस्थानात तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या कार्यकाळात ४६ हजार कोटी रुपयांचा सौर ऊर्जा प्रकल्प, जयपूर विमानतळ, तेलंगणामधील रेवंत रेड्डी सरकारने केलेले १२ हजार ४०० कोटी रुपयांचे करार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सरकारच्या काळात सहा एसईझेड, छत्तीसगडमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांच्याकडून खाणींचे कंत्राट अशी अनेक कामे अदानींच्या कंपन्यांना काँग्रेस सरकारांकडून मिळाली आहेत. तरीही राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकारचा अदानींशी संबंध जोडून, काँग्रेस आणि अदानींमधील जुने नाते लपवू पाहात आहेत, अशी टीका तावडे यांनी केली.