मुंबई : पावसालापूर्व कामकाजाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मुंबई शहर आणि उपनगरात २९ मे ते १५ जूनदरम्यान टाकाऊ साहित्य संकलनासाठी विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी ५१.५ टन राडारोडा, २८.१ टन कचरा, ४१.६ टन टाकाऊ वस्तूंचे संकलन करण्यात आले.

महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या आदेशानुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजनांसोबतच निरनिराळे उपक्रमही राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून घनकचरा व्यवस्थापन खात्याच्या माध्यमातून २९ मे ते १५ जून २०२५ दरम्यान टाकाऊ साहित्य संकलनासाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासोबतच, मोहिमेत दररोज सकाळी १० पूर्वी स्वच्छता, तसेच गरजेनुसार दुसऱ्यांदा झाडलोट (सेकंड स्विपिंग) करण्यात येत आहे.

पावसाळ्यात नदी नाल्यांच्या परिसरात, तसेच सार्वजनिक ठिकाणांवरून टाकाऊ वस्तूंचे संकलन करणे, राडारोडा उचलणे, सर्वंकष स्वच्छता करणे यावर या मोहिमेत लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. जेणेकरून पावसाळ्यात सखल, अतिसखल परिसरांमध्ये पाणी साचणार नाही. तसेच, पाण्याचा निचरा सहजरीत्या होईल. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी ५१.५ टन राडारोडा, २८.१ टन कचरा, ४१.६ टन टाकाऊ वस्तूंचे संकलन करण्यात आले. त्यासाठी ३० डंपर, २५ जेसीबी आणि इतर मिळून ६२ संयंत्रांची मदत घेण्यात आली. या कार्यवाहीमध्ये १ हजार ७२ कर्मचारी, कामगार आणि १० स्वयंसेवक सहभागी झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मोहिमेत सर्व प्रशासकीय विभाग कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात सर्वाधिक कचरा जमा होणारी ठिकाणे शोधून त्या ठिकाणी सखोल स्वच्छता करण्यात येत आहे. प्रामुख्याने टाकाऊ वस्तूंचे संकलन, रस्ते, गल्लीबोळांची स्वच्छता, पेव्हर ब्लॉक, कडेचे दगड (कर्बस्टोन), नाले व जलवाहिनीच्या इनलेट पॉईंट्सवरील जाळ्यांची स्वच्छता आदी सर्व कार्यवाही करण्यात येत आहे.