आयआयटी आणि व्हीजेटीआयच्या सल्ल्यामध्ये तफावत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई: अंधेरीमधील गोखले पूल पादचारी, दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याबाबत आयआयटी मुंबई आणि व्हीजेटीआय या दोन संस्थांनी सादर केलेल्या अहवालात तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी,  गोखले पूल पादचारी, दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवण्याची शक्यता धूसर बनली आहे. मात्र या संदर्भात मुंबई महानगरपालिका प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा गोखले पूल धोकादायक बनल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र परिसरातील नागरिक आणि वाहतुकीचा प्रश्न जटील बनल्यामुळे  हा पूल पादचारी, दुचाकी तसेच हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवता येईल का याची चाचपणी मुंबई महानगरपालिकेने सुरू केली होती. पुलाच्या दोन मार्गिका ३१ ऑगस्टपर्यंत सुरू ठेवता येतील का यादृष्टीने त्याची संरचनात्मक तपासणी करण्याची विनंती करणारे पत्र मुंबई महानगरपालिकेने आयआयटी, मुंबई आणि व्हीजेटीआय या संस्थांना पाठविले होते. मात्र या दोन्ही संस्थानी सादर केलेल्या अहवालात तफावत आढळून आली आहे.

हेही वाचा >>> नायगाव-वरळी बीडीडीवासीयांसाठी खुशखबर; तब्बल ४६० रहिवाशांना म्हाडाच्या घराची हमी

या दोन्ही संस्थानी पुलाची पाहणी करून आपापला अहवाल सादर केला आहे. यावेळी पुलाची संरचनात्मक तपासणी करण्यात आलेली नाही. मात्र काही दुरुस्ती करून पुलाचा जुना भाग सुरू ठेवता येईल, असे व्हीजेटीआयच्या अहवालात म्हटले आहे. तर मधल्या दोन मार्गिका सुरू ठेवता येऊ शकतात, त्यासाठी दुरुस्तीची गरज नाही, असे आयआयटी, मुंबईच्या अहवालात नमुद करण्यात आले आहे. या संदर्भात लवकरच मुंबई महानगरपालिका प्रशासन निर्णय घेणार आहे.

हेही वाचा >>> Mumbai Water Cut : निम्म्या मुंबईत आज पाणी नाही

अंधेरीचा गोखले पूल ७ नोव्हेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या पुलाचे संपूर्ण बांधकाम महानगरपालिकेतर्फे करण्यात येणार आहे. महानगरपालिकेने त्यासाठी निविदा मागवल्या आहेत. तर  रेल्वेच्या हद्दीतील पुलाचा धोकादायक भाग पडण्याचे रेल्वे प्रशासनाने मान्य केले आहे. मात्र हा पूल पुढचे काही दिवस हलकी वाहने आणि पादचाऱ्यांसाठी सुरू ठेवावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत होती. या पुलाचा रेल्वेच्या हद्दीतील भाग व जुना पूल  धोकादायक बनला असून तो तत्काळ पाडून टाकावा, असे महानगरपालिकेच्या सल्लागाराने नियमित तपासणीनंतर सादर केलेल्या अहवालात म्हटले होते. त्यानंतर तातडीने पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र त्यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पश्चिम उपनगरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आहे. त्यामुळे हा पूल पादचारी आणि दुचाकी, रिक्षा अशा हलक्या वाहनांसाठी सुरू ठेवता येईल का याची तपासणी सुरू करण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिका व्हीजेटीआय आणि आयआयटी अशा नामांकित संस्थांची मदत घेतली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chances of opening gokhale bridge for light vehicles are not confirmed mumbai print news ysh
First published on: 29-11-2022 at 11:03 IST