मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ (एमएफएससीडीसी) आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला. ‘सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या (क्रिएटर्स इकॉनॉमी)’च्या विकासासाठी कुशल मनुष्यबळ विकासाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. ही सहकार्याची सुरुवात असून पुढील काळात महाराष्ट्र हे देशाच्या आणि जगाच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेचे केंद्र होईल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, अपर मुख्य सचिव विकास खारगे, एफटीआयआयचे अध्यक्ष आणि अभिनेते आर.माधवन, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, एफटीआयआयचे कुलकुरू धीरज सिंग आदी उपस्थित होते.
सामान्य माणूसही आज एक क्रिएटर झाला आहे. त्याने सर्जनशीलतेच्या जोरावर एक स्वत:चे स्थान निर्माण केले असून क्रिएटर्स इकॉनॉमी ही आजची गरज बनली आहे. ही अर्थव्यवस्था ९२ हजार कोटी रुपयांवरुन १०० दिवसांमध्ये एक लाख कोटी रुपयांवर गेली असून हे क्षेत्र अतिशय वेगाने विस्तारत आहे. त्यामुळे या क्षेत्रासाठी गुणवत्तापूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम मनुष्यबळाची नितांत गरज असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.प्रशिक्षण आणि प्रमाणीकरण (सर्टिफिकेशन) या दोन्ही गोष्टी नव्या युगात अत्यंत आवश्यक आहेत. अनेकांकडे कौशल्य असूनही प्रमाणपत्र नसल्यामुळे त्यांना व्यावसायिक संधी मिळत नाहीत. या करारामुळे प्रशिक्षण आणि सर्टिफिकेशन या दोन्ही गोष्टी मिळणार आहेत. एफटीआयआय ही देशाला आणि जगाला दर्जेदार कलाकार देणारी संस्था आहे, तर महाराष्ट्राची फिल्मसिटी ही व्यावसायिक चित्रपटांचा आधार आहे. या दोन मजबूत संस्था एकत्र आल्यामुळे तिसरी अधिक सर्जनशील आणि सशक्त संस्था तयार होईल, याबाबत शंका नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
राज्य पातळीवर प्रवेशप्रक्रिया
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. शेलार म्हणाले की, एफटीआयआयची प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय स्तरावरील आहे. या सामंजस्य करारामुळे आता राज्यातील खेडोपाडी वसलेल्या विद्यार्थ्यांना राज्य पातळीवरच प्रवेश घेता येईल. त्यामुळे अगदी खेड्यांमधील मुलांनीही आता चित्रनगरीकडे करिअर घडविण्याच्या उद्देशाने पाहावे. राज्यात गोरेगाव, कोल्हापूर, प्रभादेवी आणि कर्जत या चार ठिकाणी केंद्र आहे. या करारामुळे महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी मिळतील.
एफटीआयआयचे अध्यक्ष आर.माधवन म्हणाले की, लहान शहरांमधून मोठ्या प्रमाणावर प्रतिभावान व्यक्ती पुढे येत आहेत. एक स्त्री लोणचे कसे बनवावे, हे शिकवत आहे आणि ती तिच्या ध्वनिचित्रफीती एका छोट्या झोपडीतून बनविते व त्यातून उत्पन्न मिळविते. महाराष्ट्रातील ही प्रतिभा इतिहास घडविणारी आहे. पश्चिमी देशांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच सुपरमॅन, बॅटमॅन आणि स्पायडरमॅन यांच्यात शक्ती (पॉवर) असल्याचे दाखविले जाते. पण आता वेळ आली आहे की जगाने हनुमान आणि कृष्णाचेही महात्म्य ओळखावे. आपल्या गावां-शहरांमधून आलेल्या या लोकांकडे सांगण्यासारख्या अद्वितीय कथा आहेत. त्यांच्या माध्यमातून आपण ‘सुपर पॉवर’ आणि ‘सॉफ्ट पॉवर ’ या दोन्ही गोष्टी साध्य करू शकणार आहोत.