मुंबई : ‘राज्यातील आमचे सरकार केवळ माझं कटुंब माझी जबाबदारी एवढय़ापुरते मर्यादित नसून ते सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे. म्हणूनच आम्ही घरातून काम न करता (वर्क फ्रॉम होम) थेट चिखलातही रस्त्यावर उतरून लोकांच्या मदतीला धावतो. आमचे ट्रिपल इंजिनचे सरकार सुसाट धावत असून महाविकास आघाडीचा टांगा पलटी केला नसता तर राज्य आणखी १५ वर्षे मागे गेले असते अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी ठाकरे सरकारवर केली.

दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत अजित पवार यांच्यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला बूस्टर डोस मिळाल्याची टीका केली होती. या मुलाखतीचा धागा पकडत शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. हे सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार आहे, त्यामुळे गेले वर्षभर अनेक संकटे आली, पण आम्ही शेतकरी आणि जनतेला वाऱ्यावर सोडले नाही. सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. तातडीने लोकांना मदत केली. शेतकऱ्यांना वर्षभरात १० हजार कोटींहून अधिक मदत केली. इरशाळवाडीवर आपत्ती ओढवली त्या वेळीही आम्ही धावत गेलो. आपत्तीग्रस्तांना मदत केली. त्याचे सर्व पुनर्वसन करण्यात आले असून कायमचे पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित करून सिडकोला घरे बांधण्यास सांगितले. इरशाळवाडीतील लोकांना भेटण्यासाठी काही जण चिखल तूडवत गेले तर काही जर व्हॅनिटी गाडीमधून आले, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृक्ष पाडण्याच्या अधिकारांवरून आरोप-प्रत्यारोप

शहरातील २०० हून अधिक आणि पुरातन वृक्ष पाडण्यास परवानगी देण्याचे अधिकार राज्य वृक्ष प्राधिकरणाकडून महापालिकांकडे परत देण्याच्या मुद्दय़ावर उद्धव ठाकरे गट आणि भाजप आमदारांमध्ये विधानसभेत शुक्रवारी आरोप-प्रत्यारोप झाले. उद्योगांसाठी ‘ व्यवसाय सुलभता महत्त्वाची आहेच, पण आधी नागरिकांचे सुरक्षित जीवनमान आणि पर्यावरण संरक्षणही गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केले. तर भ्रष्टाचार आणि विकास प्रकल्पांना विरोध करण्यासाठी ठाकरे गटाने आधीच्या सरकारच्या कार्यकाळात हे अधिकार राज्य सरकारकडे घेतले, असा आरोप भाजप आमदार अॅड. आशीष शेलार आणि अन्य आमदारांनी केला. मुंबईत बैलगाडीतून फिरा, असेही ठाकरे गट एखाद्या दिवशी सांगेल, अशी टिप्पणीही शेलार यांनी केली.