मुंबई: भाषा ही संस्कृतीला जीवंत ठेवण्याचे माध्यम आहे. देशातील प्रत्येक भाषेने सांस्कृतिक ठेव दिलेली आहे. या सांस्कृतिक उत्थानात भाषेचे महत्त्व असल्याने स्वभाषा, मातृभाषा आणि इतर भाषांना जीवन ठेवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. आपली मराठी भाषा ही कालही अभिजात होती, आजही अभिजात आहे, आणि उद्याही अभिजातच राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले.
अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे उद्घाटन प्रसंगी फडणवीस बोलत होते. विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ.उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, मुख्य पोस्टमास्टर जनरल अमिताभ सिंग, राज्य विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदिप दाते, अभिनेता व निर्माते महेश मांजरेकर उपस्थित होते.
मराठीचा सन्मान हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे. गावातून, घरातून ज्या ओव्या गायल्या, त्या माऊलीचा हा सन्मान असल्याचे सांगून फडणवीस यांनी मराठीचा सन्मान हा रामप्रहारी येणाऱ्या वासुदेवांचा सन्मान आहे. देवळातून गुंजणाऱ्या आरतीचा, भजन-कीर्तनाचा हा सन्मान आहे. संत परंपरेचा, शाहिरांच्या पोवाड्याचा हा सन्मान आहे. संत ज्ञानेश्वरांच्या भावार्थ दीपिकेपासून तर बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वचिंतनापर्यंत अशा सर्वच विचारवंतांचा हा सन्मान असल्याचे सांगितले.
देशातल्या एकूण ग्रंथालयांपैकी २५ टक्के ग्रंथालये महाराष्ट्रामध्ये आहेत. साहित्याची गोडी, विचारांची आवड मराठी माणसाने जोपासून ती पुढच्या पिढीपर्यंत नेण्याचा प्रयत्न केल्यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे. सर्वाधिक वाङ्मय कोश हे मराठी भाषेमध्ये असणे ही अभिमानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर, मराठीमध्ये २०० हून अधिक साहित्य संमेलने प्रतिवर्षी होतात. सर्व प्रकारच्या विचारांना प्रतिपादित करणारी, विविध व्यासपीठे उपलब्ध करून देणारी एकमेव मराठी भाषा असल्याचे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.
मराठी भाषा जागतिक स्तरावर
मराठी ही केवळ भाषा नाही, ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास आहे. ज्ञानेश्वर, तुकाराम, आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही भाषा जागतिक स्तरावर पोहोचवण्याचे काम सरकार करीत असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. दिल्लीच्या जलाहरलाल नेहरु विद्यापीठात मराठी भाषेचे केंद्र स्थापन करून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले जाणार आहे. नाशिकजवळील शिरवाडे गाव “पुस्तकाचं गाव” म्हणून विकसित होत आहे. कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी महोत्सव ग्रामीण भागात आयोजित केला जाणार आहे. लंडनमधील महाराष्ट्र मंडळ विकत घेऊन तेथे जगातील पहिलं वैश्विक मराठी भाषा केंद्र उभारले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी अभिजात मराठी या ॲपचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर अभिजात मराठी दिनानिमित्त भारतीय टपाल विभागामार्फत विशेष टपाल तिकिट आणि आवरणाचे अनावरण करण्यात आले.