मुंबई : वरळी येथील मेघवाडीतील लक्ष्मीनारायण मंदिराच्या पुनर्विकासाचा मुद्दा समोर आला आहे. खासगी बिल्डरकडून या परिसराचा पुनर्विकास केला जात असताना, १९२१ पासून अस्तित्वात असलेल्या या मंदिराचे स्थलांतर करण्यास स्थानिकांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी स्थानिकांशी संवाद साधत विकासक आणि सरकारला हे मंदिर पाडण्यास विरोध दर्शविला आहे.
ठाकरे गटाचा विरोध, विकासकाला इशारा
आदित्य ठाकरे यांनी वरळीतील मेघवाडी येथील लक्ष्मीनारायण मंदिराला भेट दिली. येथील स्थानिकांशी त्यांनी चर्चा केली पुनर्विकासात १०० वर्षे जुने लक्ष्मीनारायण मंदिर हटविण्याची काहीच गरज नाही. स्थानिकांशी चर्चा न करता मंदिरावर कारवाई करण्यात आली तर विकासकाला पाय ठेवू देणार नाही, असा इशारा ठाकरे यांनी दिला. यावेळी लक्ष्मी नारायण मंदिर समिती सदस्य, आमदार सुनील शिंदे, माजी महापौर आणि उपनेत्या किशोरी पेडणेकर, शाखाप्रमुख गोपाळ खाडे, सुनील अहिर उपस्थित होते.
केंद्रात सत्ता भाजपची, राज्यात सरकार भाजपचे, पालिकेत मिंधे लाडक्या मित्रासाठी मंदिर पाडली जात आहेत. पण आताच सांगतोय की मंदिराला हात लावू द्यायचा नाही. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे, हे आमचे पदाधिकारी पाहतील. हे मंदिर तोडू द्यायचे नाही.– आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख