१९ जणांचा मृत्यू, १०८७ रुग्ण करोनामुक्त मुंबई : राज्यात ओमायक्रॉनच्या संसर्गाचा एकही नवा रुग्ण मंगळवारी आढळून आला नाही. त्यामुळे ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या सध्या १० आहे. राज्यात दिवसभरात ६९९ नव्या रुग्णांचे निदान झाले असून १९ मृत्यू झाले. उल्हासनगर, भिवंडी महापालिका क्षेत्रात मंगळवारी एकही नवा करोना रुग्ण आढळून आला नाही.राज्यात दिवसभरात १०८७ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ६,४४५ इतकी झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत रायगड जिल्हा ३०, नाशिक जिल्हा ३२, पुणे जिल्हा १७१ नव्या रुग्णांची नोंद झाली. मुंबई १९१ नवे रुग्ण मुंबईत मंगळवारी १९१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आणि एका करोना रुग्णाचा मृत्यू झाला, तर २३५ करोनामुक्त झाले. मुंबईत मंगळवारी नोंद झालेल्या करोनाबाधितांमुळे एकूण करोनाबाधितांची संख्या ७ लाख ६४ हजार १९४ वर पोहोचली आहे, तर करोनामुक्त झालेल्यांचीही एकूण संख्या नव्या करोनामुक्त रुग्णांमुळे ७ लाख ४३ हजार ६०० झाली आहे. मुंबईत सद्य:स्थितीला एक हजार ७१४ सक्रिय रुग्ण, तर मृत रुग्णांची संख्या १६ हजार ३५१ वर पोहोचली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. मंगळवारी ३० हजार ५०१ चाचण्या करण्यात आल्या. ठाणे जिल्ह्यात ९४ नवे बाधित ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ९४ करोना रुग्ण आढळून आले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील ९४ करोना रुग्णांपैकी ठाणे ३९, नवी मुंबई ३२, कल्याण-डोंबिवली ११, ठाणे ग्रामीण सहा, अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये प्रत्येकी तीन रुग्ण आढळून आले, तर ठाणे ग्रामीणमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला.