मुंबई : बहुप्रतिक्षित व बहुचर्चित मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीच्या मतमोजणीला विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात सुरूवात झाली आहे. विशेष बाब म्हणजे यंदा प्रथमच मतमोजणी ‘सीसीटीव्ही’ यंत्रणेच्या निगराणीखाली होत आहे. तसेच मतमोजणी केंद्रावर पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

नोंदणीकृत पदवीधर गटाच्या अधिसभा निवडणुकीत एकूण १० जागांसाठी २८ उमेदवार उभे आहेत. युवा सेना (ठाकरे गट) आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचने दहापैकी दहा जागा लढवल्या आहेत. त्यामुळे यांच्यापैकी अधिकाधिक जागा कोण जिंकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच ठाकरे गटाच्या युवा सेनेने २०१० साली १० पैकी आठ जागा आणि २०१८ साली १० पैकी १० जिंकून आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यामुळे यंदाही युवा सेना मतदार नोंदणी, प्रचार आणि संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सुरुवातीपासूनच सक्रिय होती. दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचने १० पैकी १० जागा लढवून युवा सेनेला आव्हान दिले आहे. त्यांनीही निवडणूक जिंकण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. त्यामुळे युवा सेना दहापैकी दहा जागा राखणार की ‘अभाविप’ किंवा अपक्ष प्रतिनिधीही अधिसभेत प्रवेश करणार याकडे विद्यार्थी संघटना, विद्यापीठ आणि राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.

हेही वाचा – मुंबईत पावसाने जोर धरला, पहाटेपासून अनेक भागांत संततधार

‘अनेक अडचणींनंतर नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक घेण्यात आली. आमचे काम आणि आदित्य ठाकरे यांचा आश्वासक चेहरा, या गोष्टींच्या जोरावर आम्हाला अपेक्षित यश मिळेल’, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : पाणी साचण्याची कारणे शोधण्याचा पालिका प्रशासनाचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१० जागांसाठी २८ उमेदवार रिंगणात

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील नोंदणीकृत पदवीधर गटाच्या खुल्या प्रवर्गातील ५ जागांसाठी १५, तर प्रत्येकी १ जागा असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातून २, अनुसूचित जमाती प्रवर्गातून ३, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती प्रवर्गातून ३, इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी ३, महिला प्रवर्गातून २ असे एकूण २८ उमेदवार १० जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर एकूण १३ हजार ४०६ मतदारांपैकी ५५ टक्के मतदारांनी मतदान केले आहे.