मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) नुकतच दादर रेल्वे स्थानकावर बलिया-दादर एक्सप्रेसमधून सुमारे दोन टन बेकायदेशीर गुटखा आणि पान मसाला जप्त केला. जप्त केलेल्या मालाची अंदाजे किंमत साडेसहा लाख रुपये आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.

नेमकी घटना काय ?

आरपीएफद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०१०२६ बलिया एक्सप्रेस शनिवारी सकाळी ७:४५ वाजता दादर स्थानकावर आल्यानंतर हा बेकायदेशीर साठा उघडकीस आला. कर्तव्यावर असलेले पार्सल लिपिक उदय खरे यांच्या देखरेखीखाली एकूण २९ पुडकी असलेली दोन टपाल फलाट १३ आणि १४ वर उतरवण्यात आले. दुपारी २ वाजता आरपीएफचे हेड कॉन्स्टेबल सोहनलाल जाटव यांना त्या बेकायदेशीर टपालातून पान मसाला आणि तंबाखूचा तीव्र वास येत असल्याचे आढळले. त्यांनी दादर येथील आरपीएफ निरीक्षकांना सूचना दिली. उपनिरीक्षक नरसिंग मीना आणि त्यांच्या पथकासह घटनास्थळी तपासणी सुरू करण्यासाठी पोहोचले.

दादर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत, सर्व २९ टपाल उघडण्यात आले आणि त्यात तंबाखू, केसर-मिश्रित पान मसाला आणि इतर प्रतिबंधित तंबाखूजन्य उत्पादने आढळले. ज्यांचे वजन सुमारे १८९२.२ किलो होते. या सर्व वस्तू सीलबंद करून जप्त करण्यात आल्या. ४ ऑगस्ट रोजी जप्त केलेला माल पुढील कायदेशीर कारवाईसाठी दादर रेल्वे पोलिसांकडे पाठवण्यात आला.

कोणत्या गुन्ह्यांची नोंद वरिष्ठ टपाल कारकून प्रयाग काळे यांच्या लेखी तक्रारीवरून, दादर रेल्वे पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहिता (बीएनएस), २०२३ च्या कलम २२३, २७५ व ३०(२)(अ) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५९ अन्न सुरक्षा मानके अधिनियम, २००६ हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेल्वे पोलिसांचा तपास सुरू

लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांच्या आदेशानुसार, दादर रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल कदम व त्यांच्या पथकाने गुटखा जप्त केला. तसेच या गुन्ह्याची नोंद केली असून आरोपीचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर रेल्वे मार्गाद्वारे गुटखा कशाप्रकारे आणला, कुठून आणला याचा तपास सुरू आहे.