मुंबई : ‘सर्व पालकांनी पाल्याला मातृभाषेचा आदर करायला शिकवले पाहिजे. ज्या देशातील नागरिकांनी मातृभाषेत शिक्षण घेतले, त्या देशांनी प्रगती केली आणि जगाला उत्कृष्ट शास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते दिले. महात्मा गांधी यांनी देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले, परंतु इंग्रजी भाषेच्या गुलामगिरीतून आपण आजही मुक्त झालेलो नाही. आपल्याला भाषिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचे काम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून करण्यात येईल’, असे मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी व्यक्त केले.
शाळा पूर्वतयारी अभियानातील ‘पहिले पाऊल’ या उपक्रमाचा भाग म्हणून राज्यातील प्रातिनिधिक स्वरूपातील पहिला मेळावा मंगळवार, २५ एप्रिल रोजी मुंबईतील वरळी सी फेस मनपा शाळा संकुल येथे झाला. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई व मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्टार्स प्रकल्पांतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री निशिगंधा वाड, शिक्षण विभागाचे सचिव, आयुक्त, संचालक, मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका आणि इयत्ता पहिलीत दाखल होणारी मुले व त्यांचे पालक उपस्थित होते.
अभियान नेमके काय?
या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत पहिले पाऊल हा उपक्रम राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, सामाजिक न्याय विभाग आदी ६५ हजारांहून अधिक शाळांमध्ये १५ लाख मुलांच्या पूर्वतयारीसाठी राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विविध उपक्रम, खेळ, कृती, भावनिक विकास, शिस्त, कलांची ओळख कशी करून द्यावी, बालकांची क्षमता तपासून त्यांची शाळा पूर्वतयारी कशी करून घ्यावी याचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे.