मुंबईः सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्यातील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधान सभेत दिली.
काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून गायकवाड यांच्यावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली. अक्कलकोट इथे सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी गायकवाड गेले होते. तिथे त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांना गाडीतून बाहेर खेचून पाडण्यात आले, काळे फासण्यात आले. हा त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न होता असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. हा हल्ला करणारा एका पक्षाचा कार्यकर्ता असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्याच्यावर पिस्तूल बाळगण्याचा गुन्हा आहे, आपल्या चुलत भावाची हत्या केली म्हणून त्याला तुरुंगवासही झाला आहे. आरोपींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करतानाच हल्ला होणार यांची माहिती पोलिसांना नव्हती का, कार्यक्रमांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त का नव्हता अशी विचारणाही वडेट्टीवार यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपण सर्व प्रकरणाची माहिती घेतली असून आरोपींना हल्ला केला आहे. पोलीसांनी गायकवाड यांना तक्रार नोंदविण्याची विनंती केली होती. मात्र त्यांनी तक्रार दिली नाही. तरीही पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे फडणवीस यांनी सांगितले.
यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी सबंधित आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती सभागृहाला दिली.. तसेच या प्रकरणात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.