मुंबई: अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यार्गत बालगुन्हेगाराचे वय दोन वर्षांनी कमी म्हणजेच १६ वर्षे करणे आणि बाल गुन्हेगाराला गुन्हा करण्यास प्रवृत्त करणाऱ्यालाही मुख्य आरोपी ठरविण्याबाबत सरकार विचार करीत असून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत दिली. अंमली पदार्थ तस्करीत विदेशी गुन्हेगारांवरील गुन्हे मागे घेऊन त्यांना त्यांच्या देशात परत पाठविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
छत्रपती संभाजीनगरात शालेय विद्यार्थांना अंमली पदार्थांचे व्यसन लावणाऱ्या टोळीवर कारवाई करण्याबाबत विलास भुमरे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान फडणवीस बोलत होते. पोलीसांनी अंमली पदार्थ विरोधात धडक मोहीम उघडली असून प्रत्येक पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी पथक नियुक्त करण्यात आले आहे. अंमली पदार्थ प्रकरणात वारंवार गुन्हा करणाऱ्या आरोपींवर आता मकोका लावण्यात येणार असून यासंदर्भातील विधेयकास नुकतीच मंजूूरी देण्यात आली आहे.
तसेच आंमली पदार्थ प्रकरणामध्ये नायजेरियन तसेच इतर विदेशी गन्हेगारांना त्यांच्या देशात परत पाठविण्यात अडचणी होत्या. याबाबात केंद्र सरकारशी चर्चा झाली असून त्यांनी अशा विदेशी गुन्हेगारावरील गुन्हे माग घेऊन त्याना त्यांच्या देशात परत पाठविण्यास परवानगी दिली असून त्याबाबतची नियमावली केली जात असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
बालकांवरील लैगिंक अत्याचार प्रतिबंधक (पोस्को) कायदयामध्ये बाल गुन्हेगाराचे वय दोन वर्षांनी कमी करुन १६ वर्षे करण्यात आले आले आहे त्याच प्रमाणे आता अंमली पदार्थ तस्करीतही बालगुन्हेगाराचे वय कमी करण्यात येणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.