मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत माहिम येथील रेल्वेच्या जमिनीवर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवासस्थान बांधण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी आता पात्र धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी १० हजार घरांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. ३० मजली पुनर्वसित इमारतींमध्ये ही १० हजार घरे असणार असून या घरांचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे (डीआरपी) नियोजन आहे.
राज्य सरकारने आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा कायापालट करण्यासाठी धारावी पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला आहे. डीआरपी आणि नवभारत मेगा डेव्हल्पर्स प्रायव्हेट लिमिटेड (एनएमडीपीएल) यांच्या संयुक्त विद्यमाने हा पुनर्विकास मार्गी लावण्यात येत आहे. दरम्यान, या पुनर्विकासाचा आराखडा तयार झाला असून राज्य सरकारने नुकतीच या आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्याचवेळी धारावीचा पुनर्विकास टप्प्याटप्प्याने करण्याचा निर्णय डीआरपीने घेतला असून पहिल्या टप्प्यातील कामाला काही महिन्यांपूर्वी सुरुवात झाली आहे.
माहिम येथील रेल्वेच्या मालकीच्या ४७.५ एकर जागेचा समावेश धारावी अधिसूचित क्षेत्रामध्ये करण्यात आला आहे. या ४७.५ एकर जागेपैकी २८ एकर जागेचा ताबा डीआरपीला मिळाला आहे. याच २८ एकर जागेवर सध्या काम सुरू आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी येथे ३० मजली तीन इमारती बांधण्यात येत असून या इमारतींमधील घरांचा वापर सेवानिवासास्थान म्हणून केला जाणार आहे.
येथेच रेल्वेसाठी २० मजली कार्यालयही बांधण्यात येणार आहे. ही कामे सुरू असतानाच आता येथे पात्र धारावीकरांसाठी पुनर्वसित इमारती बांधण्याच्या कामाला सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पात्र धारावीकरांसाठी येथे ३० मजली इमारती बांधण्यात येत असून यातील एकूण घरांची संख्या १० हजार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. यास डीआरपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दुजोरा दिला.
रेल्वेच्या जागेवर बांधण्यात येत असलेली १० हजार घरे ३५० चौरस फुटांची असून या घरांचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्याचे डीआरपीचे नियोजन आहे. ही घरे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे वितरण सेक्टर १ मधील पात्र धारावीकरांना केले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. एकूणच पात्र धारावीकरांसाठी आता घरे बांधण्यास सुरुवात झाली असून येत्या तीन वर्षांत १० हजार धारावीकरांना हक्काची घरे मिळणार आहेत. दरम्यान, धारावी पुनर्विकासाअंतर्गत सर्वांना घरे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच अपात्र धारावीकरांना भाडेतत्वावरील योजनेत समावून घेण्यात येणार आहे.
कुर्ल्यातील २१.५ एकर, मुलुंडमधील ५८.१ एकर, आक्सामधील १४० एकर आणि देवनारमधील १२४ एकर जागा अपात्र धारावीकरांसाठी उपलब्ध झाली आहे. या जागेवर त्यांच्यासाठी भाडेतत्वावरील घरे बांधून त्यांचेही पुनर्वसन केले जाईल, असा पुनरुच्चारही डीआरपीकडून करण्यात आला आहे.