मुंबई : गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग प्रकल्पांतर्गत दिंडोशी न्यायालय – दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचे बांधकाम प्रगत टप्प्यावर आले असून एकूण ३१ खांबांपैकी २७ खांबांची यशस्वीरीत्या उभारणी पूर्ण झाली आहे. रत्नागिरी जंक्शन येथे ४ खांब उभारण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. नियोजित वेळापत्रकानुसार, खांबांवर तुळई स्थापित करणे, डेक स्लॅब ओतकाम करणे, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंचे पोहोच मार्ग व अनुषंगिक कामे करून १६ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. गोरेगाव – मुलुंडदरम्यान प्रवासासाठी ७५ मिनिटे लागतात. मात्र या प्रकल्पामुळे भविष्यात गोरेगाव – मुलुंड दरम्यानचा प्रवास २५ मिनिटात करणे शक्य होईल. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महानगरपालिका मुख्यालयात या उड्डाणपुलाच्या कामांचा आढावा घेतला. या बैठकीस प्रमुख अभियंता उत्तम श्रोते, कार्यकारी अभियंता नरेश मेघराजानी यांच्यासह संबंधित अधिकारी, अभियंता उपस्थित होते. गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता आहे. विशेषत: उत्तर मुंबईतील वाहतुकीस याचा मोठा फायदा होणार आहे. सुमारे १२.२० किलोमीटरच्या या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल आणि नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.
गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित आहे. टप्पा ३ (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरी बांधकामाचा समावेश आहे. या प्रकल्पाअंतर्गत दिंडोशी – गोरेगाव – दादासाहेब फाळके चित्रनगरीदरम्यान सहापदरी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याची लांबी १,२६५ मीटर आहे. उड्डाणपुलासाठी बॉक्स गर्डर व काँक्रिटचा वापर केला जात आहे. तसेच, रस्ता ओलांडण्याकरिता पादचारी पूल, स्वयंचलित सरकता जिन्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. या उड्डाणपुलाची उभारणी दोन टप्प्यांत करण्यात येत असून त्यामध्ये गोरेगाव बाजू आणि मुलुंड बाजू असे दोन भाग आहेत. दिंडोशी न्यायालयापासून पुलास सुरूवात होते. रत्नागिरी जंक्शन हॉटेल येथे ९० अंश कोनात उड्डाणपूल वळतो. तर, दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे उतरतो. पुलाचे एकूण ३१ खांब असून, त्यांचे उभारणी विभागांचे स्पॅन आहेत. एकूण २६ पैकी १२ स्पॅनचे काम पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित १४ स्पॅनचे काम १५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत करण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत २७ खांबांची उभारणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. तर, रत्नागिरी जंक्शनच्या वळणावरील उर्वरित ४ खांबांची उभारणी प्रगतिपथावर आहे.
खांबांची उभारणी पूर्ण करून तुळई स्थापित करणे, डेक स्लॅब ओतकाम आदी कामे १५ एप्रिल २०२६ पर्यंत केली जाणार आहेत. पुलाच्या दोन्ही बाजूस पोहोच मार्ग आहेत. त्यापैकी दिंडोशी न्यायालयाच्या बाजूकडील पोहोच मार्गाचे बांधकाम ३१ जानेवारी २०२६, तसेच, दादासाहेब फाळके चित्रनगरी येथील पोहोच मार्गाचे बांधकाम ३० एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. बांधकामानंतरची इतर अनुषंगिक कामे उर्वरित १५ दिवसांत केली जातील. तसेच, १६ मे २०२६ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्याचे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे.उड्डाणपुलाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत मुलुंड बाजूकडे काही बांधकामे बाधित होत आहेत. बाधित बांधकामांची पुनर्वसन प्रक्रिया पूर्ण करून ती जागा उपलब्ध करण्यात येईल. जेणेकरून, या भागातील पुलाच्या कामास गती मिळेल.